मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दररोज 50 च्या आत नोंदवली जाणारी रुग्णसंख्या आता 500 च्या पुढे गेली आहे. यात आता पावसाळा सुरु होत असल्याने ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त होतेय. याच पार्श्वभूमीवर आज मुंबई महापालिकेने कोरोना चाचण्या वाढवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पालिकेने यासंदर्भात आज नव्या मार्गदर्शक सुचनाही जारी केल्या आहेत. (Mumbai Corona Update)
यात कोरोना टेस्टिंगपासून ते मुंबईतील कोरोना वॉर्ड रुम पुन्हा सक्रिय करण्यासंदर्भात बीएमसीने तयारी सुरु केली आहे. बुधवारी मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वर्षा निवासस्थावर बैठक झाली. या बैठकीत बीएमसीने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नव्या गाईडलाईन्स निश्चित केल्या आहेत. मुंबईतील कोरोना चाचण्याची संख्या मोठ्याप्रमाणात वाढण्यात येईल, यासाठी टेस्टिंग लॅब आणि कर्मचाऱ्यांनी पूर्वतयारी करावी. (BMC Coronavirus Guidelines)
बीएमसीच्या नव्या गाईडलाईन्स
१) 12 ते 18 वयोगटातील लसीकरण वाढवा मोहिम आणि बुस्टर डोसची संख्याही वाढवावी.
२) कोरोना लक्षणांसह वाढत्या संसर्गाची प्रकरणे लक्षात जंबो कोविड सेंटर पुन्हा सुरु करत कर्मचाऱ्यांना अलर्ट करावेत.
३) मालाडमधील जंबो कोविड सेंटर प्राधान्याने पुन्हा सुरु होणार
४) कोरोना वॉर्ड वॉर रुम पुन्हा एकदा सक्रीय होतील.
५) खाजगी रुग्णालयांनाही अलर्ट करण्यात आले.
६) पावसाळा सुरु होत असल्याने प्रत्येक रुग्णालयात आपातकालीन स्थितीची सज्जता आहे की नाही याबाबतचा आढावा घेतला जाईल.
७) टास्क फोर्सकडून निर्देश येईपर्यंत मास्कबाबत कोणताही निर्णय नाही.
नुकतेच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत त्या जिल्ह्यांतील लोकांनी मास्क घालण्यासह सर्व खबरदारी घ्यावी.
दरम्यान महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, राज्यात प्रथमच कोरोना व्हायरसचा BA.4 या व्हेरिएंटचे 4 आणि ओमिक्रॉनच्या BA.5 व्हेरिएंटचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान कोरोना महामारीच्या सुरुवातीपासूनचं महाराष्ट्रासह मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पुन्हा रुग्ण वाढू नये यासाठी पालिकेकडूनही योग्यती खबरदारी घेतली जात आहे.