महाराष्ट्रातील डबल इंजिनचं सरकार वेगानं काम करतंय; पंतप्रधानांकडून शिंदे – फडणवीसांचे कौतुक

महाराष्ट्रातील डबल इंजिनचं सरकार वेगानं काम करतंय; पंतप्रधानांकडून शिंदे – फडणवीसांचे कौतुक

महाराष्ट्राला आज 11 विविध प्रकल्प मिळाले. महाराष्ट्रातील डबल इंजिनचं सरकार किती वेगाने काम करतय याचं हे उत्तम उदाहरण आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील अंतर कमी होईलचं पण हा महामार्ग महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांना आधुनिक कनेक्टिव्हीटीने जोडणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना, पर्यटकांना आणि विविध धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भक्तांना लाभ होणार आहे, रोजगार उपलब्ध होणार आहे, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकारचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नागपूरमध्ये महाराष्ट्रातील विविध 11 प्रकल्पांचं उद्धाटन करण्यात आले. या प्रकल्पांच्या उद्धाटनाप्रसंगी पंतप्रधान मोदींनी नागपूरकरांना संबोधित केले. यावेळी भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी नागपूरच्या टेकडीच्या गणपतीला वंदन केले, विशेष म्हणजे मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.

मोदी म्हणाले की, देशात प्रथमच असे सरकार स्थापन झाले आहे, ज्याने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना मानवी स्पर्श दिला आहे. सर्वांगीण दृष्टीकोन ठेवून हे सरकार पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष ठेवत आहे. या ‘अमृत काल’मध्ये राज्यांच्या प्रगतीमुळे राष्ट्राच्या विकासाला बळ मिळेल.

गेल्या 8 वर्षांत विचारसरणी आणि दृष्टीकोणात बदल 

गेल्या 8 वर्षांत आमची विचारसरणी आणि दृष्टीकोन दोन्ही बदलले आहेत. आम्ही ‘सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ यावर भर देत आहोत. मी जेव्हा ‘सबका प्रयास’ म्हणतो तेव्हा त्यात प्रत्येक देशवासीय आणि राज्याचा समावेश होतो. लहान असो वा मोठा, प्रत्येकाची क्षमता वाढली तरच भारत विकसित होईल, असा विश्वासही मोदींनी व्यक्त केला,

आता चौथ्या औद्योगिक क्रांतीची वेळ

पंतप्रधान म्हणाले की, ‘पहिल्या औद्योगिक क्रांतीचा फायदा आपण घेऊ शकलो नाही, दुसऱ्या-तिसऱ्या औद्योगिक क्रांतीत आपण मागे पडलो, पण आज जेव्हा चौथ्या औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे, तेव्हा संधी भारत गमावू शकत नाही. कोणताही देश शॉर्टकटने चालत नाही, देशाच्या प्रगतीसाठी, शाश्वत विकासासाठी, कायमस्वरूपी उपायांसाठी काम करणे आणि दीर्घकालीन दृष्टीकोन खूप आवश्यक आहे, असही मोदींनी नमूद केले.

देशाच्या राजकारणात आली विकृत प्रवृत्ती, सावधान राहा

यावेळी पंतप्रधान मोदींनी राजकीय विरोधकांवर निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले की, महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला राजकारणातील विकृत प्रवृत्तीपासून सावध राहण्याचे आवाहन करतो. शॉर्टकटच्या राजकारणाने देशाची प्रगती होणार नाही. राजकीय स्वार्थासाठी देशातील जनतेचे पैसे लुटण्याची विकृती प्रकृती राजकारणात आली आहे. शॉर्टकट वापरणारे राजकीय नेते, राजकीय पक्ष देशातील करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. त्यांचा उद्देश केवळ सत्तेत येणे हा असतो. त्यांच लक्ष खोटी आश्वासने देत फक्त सरकार हडपणे हा असतो ते केव्हाच देशाची प्रगती करु शकत नाही. आज भारत 25 वर्षांचं लक्ष ठेऊन काम करत आहे, अशावेळी काही राजकीय पक्ष भारताची अर्थव्यवस्था उद्धस्त करू इच्छित आहेत, असा आरोपही मोदींनी विरोधकांवर केला आहे.

यावेळी नरेंद्र मोदींनी विरोधकांना विजयाचा मंत्र देत म्हटले की, मत मिळविण्यासाठी आपल्या देशातील काही नेते उत्पन्न आणि खर्चाच्या योजना राबवून देश पोकळ करत आहेत. अशा नेत्यांचा जनतेने पर्दाफाश करावा. आमदनी अठन्नी खर्चा रुपया या म्हणीप्रमाणे जे राजकीय पक्ष काम करत आहेत ते देशाला आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त करत आहेत. अशाप्रकारे अनेक देश आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाल्याचे पाहिले. शॉर्टकट राजकारणाचा अवलंब करणाऱ्या नेत्यांना मी आदरपूर्वक सांगतो की, शाश्वत विकासाचे महत्त्व समजून घ्या. शॉर्टकट ऐवजी कायमस्वरूपी विकास करून निवडणुका जिंकता येतात, पुन्हा पुन्हा जिंकता येतात, असही मोदी म्हणाले.

प्रगतीसाठी पायाभूत सुविधा आवश्यक

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्रात दुहेरी इंजिनचे सरकार आहे. ते वेगाने काम करत आहे. याआधीच्या सरकारांच्या असंवेदनशीलतेमुळे विकासकामांना विलंब झालाच, पण त्याचा खर्चही मोठा आहे. गोसीखुर्द धरणाचे उदाहरण देताना मोदी म्हणाले की, 30-35 वर्षांपूर्वी या धरणाचा पाया रचला गेला. त्याची अंदाजे किंमत 400 कोटी होती. मात्र शासनाच्या असंवेदनशीलतेमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही. धरणाचा अंदाजित खर्च 400 कोटींवरून 18 हजार कोटींवर पोहोचला आहे. 2017 मध्ये डबल इंजिनचे सरकार स्थापन झाल्यानंतर त्याच्या कामाला वेग आला. हे धरण आता भरले आहे.

आखाती देश भारतातील लाखो लोकांना रोजगार देतात. आखाती देशांनी त्यांच्या पायाभूत सुविधा भविष्याच्या अनुषंगाने तयार केल्या आणि ते सतत अपडेट करत राहिले. सिंगापूर हे देखील एके काळी सामान्य बेट होते. पायाभूत सुविधांचा विकास करून त्यांनी जगाला आकर्षित केले. आज भारतातील अनेकांना सिंगापूरमध्ये जाण्याची इच्छा होते, असही मोदींनी नमूद केले.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते समृद्धी महामार्ग, वंदे भारत एक्सप्रेस अन् एम्स नागपूरचं लोकार्पण

First Published on: December 11, 2022 1:01 PM
Exit mobile version