‘या’ प्रकल्पांचा आग्रह महाराष्ट्राला प्रदूषणाच्या विळख्यात नेणारा

‘या’ प्रकल्पांचा आग्रह महाराष्ट्राला प्रदूषणाच्या विळख्यात नेणारा

मुंबई – देशभर वायू प्रदूषणात (Air Pollution) वाढ झाल्याचे समोर येत असतानाच आता महाराष्ट्रही डेंजर झोनकडे झुकत असल्याचं हवामान तज्ज्ञांनी वर्तवलं आहे. महाराष्ट्रात सुरू असलेल्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील उत्सर्जनामुळे महाराष्ट्रात वायू प्रदूषणात वाढ होत असल्याची माहिती ‘असर’ने दिली आहे. राज्यातील हवेत तरंगणाऱ्या रासायनिक अतिसूक्ष्म कणांचे (एरोसोल Aerosol) प्रमाण वाढल्याने धोकादायक पातळीवरून अतिधोकादायक पातळीवर प्रमाण जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात असे प्रदूषणकारी प्रकल्प महाराष्ट्रात आल्यास महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था सलाईनवर जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – धक्कादायक: जगभरात सर्वाधिक वायूप्रदूषण भारतात; दिल्ली, मुंबईसह अनेक शहरांत हवेचा दर्जा घसरला

कोलकाता येथील बोस इन्स्टिट्यूटमधील सहयोगी प्राध्यापक डॉ. अभिजीत चटर्जी आणि त्यांच्या पीएचडीच्या विद्यार्थिनी मोनामी दत्ता यांनी केलेल्या ‘अ डीप इन्साइट इनटू स्टेट-लेव्हल एरोसोल पोल्यूशन इन इंडिया’ या अभ्यासातून हा अहवाल समोर आला आहे. हा शोधनिबंध एल्सिव्हियर जर्नलमध्ये ऑगस्ट २०२२ मध्ये प्रकाशित झाला. याची माहिती ‘असर’ने दिली.

कोळसाधारित विद्युत निर्मितीतील प्रकल्पांमुळे राज्यात एओडीचे (एरोसोल ऑप्टिकल डेप्थ म्हणजेच वातावरणातील एरोसोलचा परिमाण मांडणारा अंदाज) प्रमाण धोकादायक आहे. म्हणजे, यासाठी ऑरेंज झोन देण्यात आला आहे. एओडीचं हे प्रमाण ०.४ ते ०.५ इतके आहे. हे प्रमाण ०.५ च्या वर गेल्यास महाराष्ट्र अतिधोकायक पातळीवर पोहोचेल.

हेही वाचा – पाच दिवसांत हवेचे प्रदूषण तिप्पट

एरोसेल विषारी का?

वातावरणातील उच्च प्रमाणातील एरोसोलमध्ये सागरी मीठ, धूळ, सल्फेट, ब्लॅक आणि ऑरगॅनिक कार्बन यांचे अतिसूक्ष्म कण असलेल्या पार्टिक्यूलेट मॅटरचा (पीएम २.५ आणि पीएम १०) समावेश असतो.

एरोसेल प्रदूषण कसं होतं?

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रे, घनकचरा जाळणे आणि वाहनांद्वारे होणाऱ्या उत्सर्जनामुळे महाराष्ट्रातील एरोसोल प्रदूषण वाढते आहे, असं अभ्यासातून समोर आलं आहे. औष्णिक विद्युत प्रकल्पांमुळे एरोसोलच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. २०१५ ते २०१९ मध्ये ३१ टक्क्यांवरून ३९ टक्क्यांपर्यंत ही वाढ नोंदवण्यात आली आहे. एरोसेल श्वसनाद्वारे शरीरात गेल्यास मानवी आरोग्यास घातक असतात.

परिणाम काय होणार?

कोळसाधारिक विद्युतनिर्मिती प्रकल्प राज्यात निर्माण झाल्यास राज्यातील प्रदूषणाची पातळी अतिधोकादायक पातळीवर जाण्याची शक्यता आहे. प्रदूषण वाढल्यास महाराष्ट्रातील मृत्यूदरातही वाढ होईल. महाराष्ट्रात राहणाऱ्या नागरिकांचं आर्युमान कमी होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

First Published on: November 8, 2022 9:34 AM
Exit mobile version