डोंबिवलीत तीव्र पाणी टंचाई; नागरिकांची टँकरवर झुंबड

डोंबिवलीत तीव्र पाणी टंचाई; नागरिकांची टँकरवर झुंबड

राज्यात दुष्काळ जन परिस्थीती उद्भवलेली असल्याचे दिसून येत आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी प्रश्न उद्भवू नये म्हणून मुंबई महापालिकेने १५ ऑक्टोबरपासून १० टक्के पाणी कपात सुरु केली आहे. मात्र अजूनही काही भागात पाणी नसल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईतील डोंबिवली भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई उद्भवलेली आहे. या परिसरात अक्षरश: टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामुळे डोंबिवलीकरांची टँकरवर झुंबड पडलेली

पाण्यासाठी मारामार

डोंबिवली पश्चिमेतील गरिबाचावाडा येथील जलकुंभाला गळती लागली आहे. ही गळती दुरुस्ती करण्यासाठी या परिसरातील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. पाणी पुरावठा बंद केल्यामुळे तेथील नागरिकांनी पाण्याच्या टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. जरी महापालिकेकडून नागरिकांना मोफत पाण्याचे टँकर देण्याची सोय करण्यात आली असली तरी हवे तेवढे पाणी मिळत नाही. त्यामुळे टँकरचे पाणी मिळवण्यासाठी महिलांची झुंबड पडत असून पाण्यावरुन अक्षरश: महिलावर्गत वादावादी पर्यंत मजल गेल्याचे पहावयास मिळत आहे.


वाचा – दुष्काळामुळे उडालेली धुळधाण


गळतीमुळे पाण्याकरता डोंबिवलीकरांचे हाल

गेल्या ६ महिन्यांपासून डोंबिवली पश्चीमेतील गरीबाचावाडा जलकुंभाच्या टाकीमधील गळतीमुळे पाणी २४ तास वाहत आहे. अतिशयवेगाने पाणी वाहत असल्याने हा सर्व परिसर जलमय होतो. त्यामुळे अनेक वेळा येथील लोकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. तसेच या वाहत्या पाण्यामुळे टाकी लवकर रिकामी होत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. केडीएमसीच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना अनेकवेळा याबाबत स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधी तक्रारी केल्या आहेत. तरी देखील या बाबत प्रशासनाला गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.


वाचा – दुष्काळाचे ढग


मंगळवारी पाणी पुरवठा बंद

डोंबिवलीत दर मंगळवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येतो. त्यामध्ये नागरिकांची विशेषतः महिलावर्गाचे अतोनात हाल होत असताना दुसरीकडे असे लाखो लीटर पाणी दररोज वाया जात असल्याने नागरीक संताप व्यक्त करीत आहेत. अखेर याबाबत अनेकांनी तक्रारी केल्याने महापालिकेकडून सदर जलकुंभ दुरुस्तीसाठी सुमारे १५ दिवसासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याचा मोठा फटका त्या जलकुंभातुन पाणीपुरवठा होणाऱ्या महाराष्ट्रनगर, गरिबाचावाडा, गायकवाडवाडी, नावापाडा येथील लाखो नागरिकांना बसला आहे. महापालिकेकडून नागरिकांची तहान भागविण्यासाठी पाण्याचे टँकरची सोय केली आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत टँकरची संख्या खूपच अपुरी असल्याचे नागरिकांमध्ये पाण्यावरून वाद होताना दिसून येत आहेत. जर लवकरच या पाणी समस्येच्या जुंबडीवर तोडगा काढला नाही तर भविष्यात एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाणी कापतीवर पर्यायी व्यवस्था म्हणून नागरिकांसाठी मोफत पाण्याचे टँकर दिले जात आहे. दररोज तीन टँकरद्वारे १० ते १५ फेऱ्या मारून नागरिकांना पाणी पुरवठा केला जात आहे. पुढील १० दिवस या परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याने नागरिकांनी सहकार्य करावे.  – अनिरुद्ध सराफ, पाणी पुरवठा विभाग

First Published on: December 6, 2018 6:56 PM
Exit mobile version