एपीएमसी मार्केटला झाले मोठे नुकसान

एपीएमसी मार्केटला झाले मोठे नुकसान

नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट

शासनाने फसवल्याचा आरोप करत एपीएमसी मधील माथाडी आणि व्यापाऱ्यांच्या आंदोलनाने पहिल्याच दिवशी शासनाला कोंडीत पकडण्याचा निर्णय घेतला. एकदिवसीय बंद ऐवजी आता व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद ची हाक दिलेली. आंदोलनकर्त्यांनी बेमुदत बंदची घोषणा केल्याने याचा मोठा फटका सर्वच स्तराला बसणार आहे. आंदोलनाच्या दिवशी पाचही मार्केटचा खरेदी विक्री अभावी आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने सुमारे ८० कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल कोलमडून पडली आहे. एपीएमसी बंदमुळे शेतकरी, वाहतूकदार व्यावसायिक, सामान्य ग्राहकांना याचा फटका बसला आहे. बंदची मुदत वाढल्याने देशभरात कृषी उत्पादन पाठविणाऱ्या शेतकऱ्यांना आणि वाहतूकदारांना सुमारे ऐंशी कोटी रुपयांपेक्षा अधिक फटका सोसावा लागला आहे.

आकडा आणखी वाढण्याची शक्यता

आंदोलन सुरूच राहिल्यास हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. हंगामी माथाडी कामगारांचा रोजगार या बंद मध्ये बुडत आहे.यातच थेट पणन करणाऱ्या व्यापाऱ्यांनी या स्थितीचा फायदा घेवून परस्पर मुंबई व उपनगर परिसरात चढ्या दराने भाजी पाला विक्री करून आपलेच उखळ पांढरे केल्याने सामान्य ग्राहकांना महागडी भाजी खरेदी करण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे.बाजार बंद असल्याने आंदोलनाच्या अगोदर आलेल्या वाहतूकदारांना मोठा फटका बसला आहे.बंद मुळे अडकून पडल्याने या वाहतूकदारांना रोजच्या खर्च भागवणे अवघड झाले आहे.विशेषतः निर्यातदार व्यापाऱ्यांचा उत्पादन आणलेले हे वाहतूकदार आर्थिक संकटात सापडले आहेत.उस्मानाबाद येथील राजेश काटे या वाहतूकदारांच्या डोळ्यातून ओढवलेल्या परिस्थितीचे वर्णन करताना अश्रू लपवता आले नाही.निर्यातदार व्यापाऱ्याने हात वर केल्याने हा वाहतूकदार पूर्ण मेटकुटीला आला आहे.

आंदोलन आणखी चिघळेल

या व्यापाऱ्यांच्या मागणीला प्रतिसाद मिळाला नाही तर आंदोलन आणखी चिघळेल असा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.दरम्यान कैलास ताजणे,शंकर पिंगळे यांनी जाचक कायदा आणि पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी बुधवारी सकाळी भाजी पाला बाजार आवारात सभा घेवून शासनावर टीका केली आहे.

First Published on: November 28, 2018 2:37 PM
Exit mobile version