मुंबई पुन्हा एकदा जखमी झाली – शालिनी ठाकरे

मुंबई पुन्हा एकदा जखमी झाली – शालिनी ठाकरे

मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे

भक्ती शिंदे, रंजना तांबे, अपूर्वा प्रभू, मोहन कायनगुडे, तपेंद्र सिंग, झाहिद खान या सहा जणांना काल, गुरुवारी आपला जीव नाहक गमवावा लागला. हे सहा जण म्हणजेच मुंबई आहे! काल मुंबई पुन्हा एकदा जखमी झाली!, अशी खंत मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. गुरुवारी सीएसएम येथे झालेल्या पूल दुर्घटनेवर त्यांनी प्रतिक्रीया देताना सरकार आणि पालिकेला जाब विचारला आहे. या मुंबईत कधी काय कोसळेल आणि त्याखाली आपण कसे दाबले- गाडले जाऊ, याची काहीच शाश्वती उरलेली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.

काय म्हणाल्या शालिनी ठाकरे

एलफिन्स्टन दुर्घटना घडल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या संतप्त मोर्चात आपण सर्वजण सहभागी झालो होतो. स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा तेव्हा राजसाहेबांनी उपस्थित केला होता, पण दुर्दैवाने सत्ताधारी आणि प्रशासकीय वर्तुळाने त्याचा योग्य तो पाठपुरावा केला नाही आणि मुंबईकरसुद्धा झालं गेलं विसरून आपल्या कामामागे धावू लागले. मध्यंतरी अंधेरीत एक दुर्घटना घडली तेव्हा आणि त्यानंतर कालची दुर्घटना घडली तेव्हाही प्रशासन जागे होते. मात्र संबंधित मंत्री थातुमातूर उत्तरं देऊन वेळ मारून नेतात.

सत्ताधाऱ्यांना उत्तरं द्यावीच लागतील

कालच्या घटनेमुळे ज्यांच्या घरावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहभागी आहे. या घटनेमुळे मनात एकीकडे दुःख होत असलं तरी दुसरीकडे चीड निर्माण होतेय. केवळ ३० वर्षांपूर्वी बांधलेला पूल कोसळतोच कसा संबंधित यंत्रणांना त्याचा काहीच अंदाज कसा येत नाही, स्ट्रक्चरल ऑडिट वेळोवेळी का केले गेले नाही, असे अनेक प्रश्न या दुर्दैवी घटनेतून निर्माण झाले आहेत. संबंधित सत्ताधारी आणि प्रशासकीय वर्तुळातील लोकांना या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील आणि हो, जोपर्यंत उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत आपण मुंबईकरांनी प्रश्न विचारणं थांबवू नये.

हेही वाचा –

२४ तासात अहवाल द्या; पालिका आयुक्तांचे दक्षता विभागाला आदेश

‘मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा तमाशा बंद करावा’ – संजय निरुपम

‘हा’ पूल महापालिकेचाच; अखेर शिक्कामोर्तब

First Published on: March 15, 2019 1:46 PM
Exit mobile version