महाराष्ट्रात लोकशाही आहे का, संजय राऊत यांचा पंतप्रधानांना सवाल

महाराष्ट्रात लोकशाही आहे का, संजय राऊत यांचा पंतप्रधानांना सवाल

नवी दिल्ली : राज्य विधिमंडळात शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी घेतलेली भूमिका विधानसभा अध्यक्ष बदलतात. हे ध्यानी घेता महाराष्ट्रात लोकशाही आहे का, असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला आहे.

हेही वाचा – गुजरातसोबतच महाराष्ट्राच्या मध्यावधी निवडणुका होतील, संजय राऊतांचा दावा

शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर कोणती शिवसेना खरी यावर संघर्ष सुरू आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान या वादाला हवाच मिळाली आहे. या निवडणुकीसाठी दोन्ही गटांकडून व्हिप जारी करण्यात आले होते. महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेनेचे राजन साळवी यांना मतदान करण्याचे निर्देश शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिले होते. तर, भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना मतदान करण्याचे निर्देश शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी दिले होते.

हे मतदान झाल्यानंतर विधानसभेचे उपाध्य़क्ष नरहरी झिरवळ यांनी शिंदे गटाच्या आमदारांकडून व्हिपचे पालन झाले नसल्याची नोंद रेकॉर्डवर आणली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना पक्षाच्या नेतेपदी अजय चौधरी आणि प्रतोदपदी सुनील प्रभू यांची नियुक्ती रद्द करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी तसेच प्रतोद म्हणून भरत गोगावले यांची निवड कायम ठेवली. अशा प्रकारे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी परस्पर भूमिका घेतल्याने आज त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – राहुल नार्वेकर पहिले नव्हे, तर दुसरे तरुण विधानसभा अध्यक्ष

हाच मुद्दा उपस्थित करत संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. विधिमंडळात जे काही सुरू आहे, ते लोकशाहीला धरून आहे का? ही लोकशाही आहे का? असा सवाल त्यांनी पंतप्रधान मोदी यांना केला आहे. या सर्व प्रकारावरून शिवसेना कमकुवत झाली असे वाटत असले तरी, ती केवळ कागदावरच कमकुवत आहे. प्रत्यक्षात मात्र ती कणखरच आहे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – कानटोप्या घालाव्यात तसे भगवे फेटे घालून ‘मावळे’ होता येईल काय? शिवसेनेचा हल्लाबोल

First Published on: July 4, 2022 10:29 AM
Exit mobile version