डोलवी एमआयडीसी रद्द न केल्यास जेएसडब्लूचे गेट बंद करू, आमदार जयंत पाटील यांचा इशारा

डोलवी एमआयडीसी रद्द न केल्यास जेएसडब्लूचे गेट बंद करू, आमदार जयंत पाटील यांचा इशारा

पेण तालुक्यातील प्रस्तावित डोलवी औद्योगिक विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत भूसंपादन होणार आहे. जेएसडब्लू कंपनीसाठी हे भूसंपादन होत असून या भूसंपादनाला येथील शेतक-यांचा विरोध आहे. त्यामुळे डोलवी एमआयडीसी प्रकल्प रद्द करावा अन्यथा जेएसडब्लू कंपनीचे गेट बंद केले जातील असा इशारा आमदार जयंत पाटील यांनी गडब येथे झालेल्या शेतकर्‍यांच्या सभेत दिला.

पेण तालुक्यातील डोळवी औद्योगिक विकास क्षेत्रासाठी काराव – गडब , डोळवी, वडखळ बोरी ग्रामपंचायत परिसरातील बेणेघाट,कोलवे, वावे, डोळवी,खारकारावी, काराव, खारमांचेळा, खारघाट, खारचिर्बी, खारजांभेळा, खारढोंबी या गावातील २१०० एकर जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला येथील शेतक-यांनी विरोध दर्शविला आहे. या संदर्भात गडब येथे शेतक-यांची सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे,पंचायत समिती सदस्य प्रदिप म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते अरुण शिवकर, वैशाली पाटील, प्रसाद भोईर, संजय डंगर सरपंच अपर्णा कोठेकर, उपसरपंच दर्शना पाटील पाटील आदिसह शेतकरी उपस्थित होते.

येथील शेतक-यांची लढाई वेगळी आहे. राजकारणातील मतभेद बाजूला ठेवून येथील लढाई लढायची आहे. पेण तालुक्यातील शेतक-यांनी सेझ विरुध्दची लढाई जिंकली आहे. जेएसडब्लू कंपनीने येथील जमिनीची मागणी केली असेल तर आपली लढाई कंपनीविरोधात आहे. स्थानिकांना कंपनीत प्राधान्य मिळाले पाहिजे. या जिल्ह्यातील दोन मंत्र्यानी ही एमआयडीसी रद्द करावी असे आवाहन आमदार जयंत पाटील यांनी यावेळी केले. यासाठी विधान परिषदेत आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शेतक-यांची एकजूट महत्वाची आहे. पुर्वजांनी जपणूक केलेल्या जमिनी वारसा हक्काने राखायच्या आहेत. पुढच्या पिढीला वारसा हक्क मिळाला पाहिजे. येथील एमआयडीसी रद्द करा नाही तर येथील शेतकरी सरकारला ऐकणार नाहीत. विधानसभेत हा प्रश्न मांडणार आसल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले.

First Published on: February 11, 2022 9:00 PM
Exit mobile version