उल्हासनगर पालिकेचे कर्मचारी निवडणूक कामात, पालिकेचं कामकाज ठप्प

उल्हासनगर पालिकेचे कर्मचारी निवडणूक कामात, पालिकेचं कामकाज ठप्प

उल्हासनगर महापालिका

उल्हासनगर महापालिकेचे बहुतेक कर्मचारी हे निवडणूक कामकाजात लागल्याने महापालिकेतील सर्वच विभागातील कामे ठप्प झाली आहेत. नागरिकांची कोणतीही कामे सध्या होत नसल्याने त्यांचे येणे-जाणे वाया जात आहे. तर शहरातील मुलभूत सुविधांची कामे सुद्ध ठप्प पडली आहेत. या बाबत महापालिकेचे उपायुक्त संतोष देहेरकर यानी माहिती देताना सांगितले की, ‘उल्हासनगर महापालिकेचे कर्मचारी हे विधानसभा १४१, अंबरनाथ विधानसभा १४० आणि कल्याण पूर्व विधानसभा १४२ या तीनही मतदारसंघांमध्ये निवडणूक कामकाजाकरता नियुक्त केले आहेत. जवळपास ९० टक्के कर्मचारी हे निवडणूक कामात व्यस्त असल्याने महापालिकेच्या कामकाजावर त्याचा परिणाम झाला आहे. जोपर्यंत निवडणूक पार पडत नाही तोपर्यंत अशीच महापालिकेची स्थिती राहणार असल्याचे देहेरकर म्हणाले आहेत.


हेही वाचा – उल्हासनगरचे नाव बदलणार? वाचा सत्य परिस्थिती

बोनसऐवजी कर्मचाऱ्यांना आगाऊ रक्कम

दरम्यान, शहरातील महत्वाची सुविधा म्हणजे पाणी पुरवठा हे काम निश्चित वेळेत होणार आहे. यासाठी महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख हे प्रयत्नशील आहेत. तर शहरवासीयांना मुलभूत सुविधा पुरवण्याकरता काही आरक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शहरातील कचरा उचलणे, अग्निशमन दल, पाणी पुरवठा, आरोग्य सेवा या साठी कर्मचारी कामे करत आहेत. निवडणूक आचारसंहिता लागल्याने कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तेव्हा कर्मचाऱ्यांना आता बोनसऐवजी आगाऊ म्हणून रक्कम देण्यात येणार आहे. निवडणूक संपल्यावर बोनस बाबतचा प्रस्ताव मंजूर करुन सानुग्रह अनुदान म्हणून कर्मचाऱ्यांना रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती देहेरकर यांनी दिली आहे.

First Published on: October 13, 2019 10:18 PM
Exit mobile version