श्रावण महिन्यात अनेकांचे उपवास असतात. त्यामुळे उपवास करणाऱ्या व्यक्तीला सातत्याने भूक लागत असते. अशावेळी वेफर्स आणि इतर पेयाचे सेवन करुन देखील पोट भरत नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोट भरणाऱ्या उपवासाच्या रेसिपी सांगणार आहोत.
कचोरी
साहित्य :
- पाव किलो रताळी
- दोन बटाटे
- 1 वाटी खवलेले खोबरे
- 5-6 हिरव्या मिरच्या
- अर्धी वाटी बेदाणे
- चिरलेली कोथिंबीर
- मीठ
- साखर
कृती :
सर्वप्रथम रताळी आणि बटाटी उकडून घ्यावी. उकडलेली रताळी आणि बटाटे मॅश करून त्यात मीठ घालावे. त्यानंतर खोबरे, बेदाणे, मिरच्यांचे तुकडे, कोथिंबीर व मीठ घालून सारण तयार करावे. बटाटे आणि रताळ्याची पारी करून त्यात थोडे सारण भरून कचोर्या तयार कराव्यात. भगर किंवा शिंघाड्याच्या पिठात घोळवून तुपात तळाव्यात आणि चटणीबरोबर सर्व्ह करा.
अनारसे
साहित्य :
- वरई तांदूळ आवश्यकतेनुसार
- साखर किंवा गूळ
- खसखस
- तूप
कृती :
ज्या दिवशी अनारसे करायचे असतील त्याच्या आधी तीन दिवस वरीचे तांदूळ भिजत ठेवावेत. त्यानंतर ते तांदूळ चांगले गाळून कपड्यावर अर्धवट वाळवावे. त्यानंतर खलबत्त्यात चांगले बारीक कुटून घ्यावेत. यात जेवढे पीठ त्याच्या निमपट साखर किंवा गूळ आणि तुपाचे मोहन घालून पीठ चांगले भिजवून घेऊन झाकून ठेवावे. नंतर दुसरे दिवशी नेहमी अनारसे करतो तसे अनारसे थापावेत. त्यावर खसखस लावावी आणि लालासर रंगावर तळून घ्यावेत.
मेदू वडे
साहित्य :
- 1 कप वरी
- एक मोठा उकडलेला बटाटा
- 1/4 कप शेंगदाणे कुट
- 1/4 कप दही
- 1 चमचा जिरे
- 4 मिरच्या बारीक चिरुन
- 2 चमचे बारीक कापलेले ओले खोबरे
- मीठ
- तळण्यासाठी तेल
कृती :
2 कप गरम पाण्यात मीठ घालून भगर धुवून घालावी आणि त्याचा भात करून घ्यावा. त्यानंतर भात पूर्ण थंड झाल्यावर मोकळा करून त्यात बटाटा किसून घालून घ्यावा. त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कुट, दही, जिरे, खोबरे, मिरची, मीठ घालून पाच मिनिटे चांगले मळून घ्यावे. त्यानंतर त्याचे मेदू वड्यासारखे गोळे करून घ्यावे. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात वडे तळून घ्यावेत. हे खुसखुशीत उपवासाचे वडे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.
राजगिऱ्याचा डोसा
साहित्य :
- दोन वाट्या राजगिऱ्याचे पीठ
- 2-3 मिरच्या
- मीठ
- 1 टिस्पून जिरे
- 1 उकडलेले रताळे
- तूप
- आवडीनुसार पाणी किंवा ताक
कृती :
मिरच्या, मीठ आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावेत. त्यानंतर त्यात उकडलेले रताळे कुस्करून राजगिऱ्याच्या पीठात मिसळावे. नंतर मिक्सरमध्ये बारीक केलेले मिश्रण घालून पाणी किंवा ताक मिसळून डोशाच्या पिठाप्रमाणे पीठ तयार करावे. हे तयार झालेले पीठ नॉनस्टिक पॅनवर तूप टाकून डोसे तयार करावेत. हे तयार झालेले स्वादिष्ट डोसे दह्याबरोबर किंवा चटणीसोबत खावेत.
पनीर कटलेट
साहित्य :
- 250 ग्रॅम ताजे पनीर
- 1/2 कप शिंगाड्याचे पीठ
- 2-3 हिरव्या मिरच्या
- 1/2 लिंबाचा रस
- बारीक चिरलेली कोथिंबीर
- चवीप्रमाणे मीठ
कृती :
सर्वप्रथम पनीर चांगले किसून घ्यावे. त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला. आता शिंगाड्याचे पीठ बारीक चाळणीने चाळून घ्या आणि त्यामध्ये किसलेले पनीर आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या मिसळून घ्या. त्यामध्ये लिंबाचा रस, सैंधव मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. त्याचे कटलेट बनवून घ्या. आता तव्यावर तेल घालून दोन्ही बाजूने खमंग परतून घ्या. तयार कटलेट हिरवी चटणी किंवा दह्या सोबत सर्व्ह करा.