मशिदींवरील भोंगा आणि हनुमान चालीसा पठणाच्या मुद्द्यावरून सध्या देशभरात चांगलंच वातावरण तापलं आहे. अशातच आता उत्तर प्रदेशातील अयोध्येत एक नवी घटना घडली आहे. या घटनेमुळे धार्मिक वादाला वाचा फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अयोध्येत काही समाजकंटकांकडून शहरातील कोतवाली नगर परिसरातील दोन मशिदी आणि एका ठिकाणी अपशब्द लिहिलेला कागद रस्त्यावर फेकण्यात आला आहे. या कागदावर गैर-समुदायाच्या पवित्र ग्रंथाबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात आली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच अयोध्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आतापर्यंत ७ जणांना ताब्यात घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी अयोध्येतील तातशाह आणि काश्मिरी भागातील दोन प्रमुख मशिदींबाहेर आणि घोसियाना येथे अन्य ठिकाणी आक्षेपार्ह कागदपत्रे पडलेली दिसली. या पेपरमध्ये एका पंथाच्या पवित्र ग्रंथावर अशोभनीय गोष्टी लिहिल्या होत्या. मात्र, वातावरण चिघळण्यापूर्वीच अयोध्या पोलिस आणि प्रशासनातील सर्व उच्चपदस्थ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. पोलिस आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे स्कॅन करत आहेत, जेणेकरून असे कृत्य करणाऱ्यांचा शोध घेता येईल.
सीसीटीव्हीची तपासणी केली असता पोलिसांना संबंधित परिसरात चार मोटारसायकस्वार आणि त्यांच्यासोबत 11 जण दिसले. तसंच, यांच्यातील एक व्यक्ती मोटारसायकलवरून उतरून वादग्रस्त साहित्य फेकताना दिसला. आपली ओळख लपवण्यासाठी त्या 11 जणांनी डोक्यावर मुस्लिम टोप्या घातल्या आणि मोटारसायकलच्या नंबर प्लेट बदलल्या किंवा काढून टाकल्या.
दिनांक 26/27.04.22 की रात्रि शहर अयोध्या के मस्जिदों में आपत्तिजनक पोस्टर, व वस्तु डालकर शहर मे दंगा फैलाने की कोशिश करने वाले 07 अभियुक्त गिरफ्तार, घटना मे प्रयुक्त वाहन एवं मोबाइल बरामद,#SSP_अयोध्या @ShaileshP_IPS की बाईट।https://t.co/uiLcdNyt8D pic.twitter.com/hu2VIGLnzP
— AYODHYA POLICE (@ayodhya_police) April 28, 2022
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत हनुमान जयंतीच्या दिवशी घडलेल्या घटनेचा बदला घेण्याच्या उद्देशाने ही घटना घडवण्यात आल्याचे आरोपींनी स्पष्ट केलं. याप्रकरणी पोलिसांनी मुस्लिम धर्मगुरूंसोबत बैठक देखील घेतली. या बैठकीत पोलिसांनी असे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिलं.
देशभरात धार्मिक हिंसाचाराच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची पाहायला मिळत आहे. अलीकडेच दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर दगडफेक आणि हिंसाचार झाल्याची घटना घडली होती. याचेच पडसाद देशभरात उमटले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 23 हुन अधिक आरोपीना अटक केली आहे.
हेही वाचा – Bhavana Gawali : भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स, चौकशीला न आल्यास ED कारवाई करणार