लोकांचा रोष कसा थांबवणार, संतोष बांगर हल्लाप्रकरणी यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया

लोकांचा रोष कसा थांबवणार, संतोष बांगर हल्लाप्रकरणी यशोमती ठाकूरांची प्रतिक्रिया

अमरावती – राज्यात शिवसेना विरुद्ध शिंदे गट राजकीय संघर्ष पेटला आहे. त्यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यातच शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या कारवर अमरावती येथे काही शिवसैनिकांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. याप्रकरणी एक व्हिडीओ समोर आला आहे. लोक संतापाचा हा उद्रेक होता, असं अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे गेले असताना अंदाजे 7 ते 8 शिवसैनिकांनी आधी संतोष बांगर यांची कार अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु कार न थांबल्याने शिवसैनिकांनी मागून पळत जाऊन कारच्या काचेवर हात मारले. यावेळी शिवसैनिकांनी ५० खोके, एकदम ओक्के, अशा घोषणादेखील दिल्या.

हेही वाचा – आमदार संतोष बांगर यांच्या कारवर शिवसैनिकांकडून हल्ल्याचा प्रयत्न

“आता असं आहे की ही मंडळी आहेत जी पैसे घेऊन निघून गेले. संजय बांगरने तर अतिशय चुकीचं कृत्य केलं होतं. आदल्या दिवशी ते ठाकरेंसाहेबांबरोबर होते. दुसऱ्या दिवशी त्यांना काय आमिष दिलं गेलं ते कसे गेले हे त्यांचं त्यांना माहिती,” असं म्हणत यशोमती ठाकूर यांनी संतोष बांगर यांच्यावर हल्लाबोल केला.  “हा लोकांचा रोष आहे. पण लोकांनी मानहानी करू नये एवढंच मी सांगेन. पण लोकांचा रोष आहे तो आपण थांबवू तरी कसा शकतो?” असा प्रतिप्रश्नही त्यांनी विचारला.

कारला टच तरी करून दाखवा – संतोष बांगर

माझ्या कारला हात लावण्याची कुणाचीही हिंमत नाही. जे आमच्याविरोधात घोषणाबाजी करून आमच्यावर हल्ले करण्यास चिथावणी देत आहेत, त्यांच्या घरासमोर मी माझी कार लावायला तयार आहे. माझ्या कारला साधे टच जरी करून दाखवले तरी मी आमदारकीचा राजीनामा देईन, असे आव्हान आमदार संतोष बांगर यांनी दिले आहे.

First Published on: September 26, 2022 3:21 PM
Exit mobile version