राजीनाम्यानंतर ठाकरेंचा पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद, मांडले ‘हे’ तीन महत्त्वाचे मुद्दे

राजीनाम्यानंतर ठाकरेंचा पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद, मांडले ‘हे’ तीन महत्त्वाचे मुद्दे

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारात त्यांच्यासोबत तब्बल ४० हून अधिक आमदार गुवाहाटीत नेले. त्यामुळे महाराष्ट्राचं सरकार अस्थिर झालं आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. दरम्यान,फेसबूक लाईव्हद्वारे राजीनामा दिल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला नव्हता. अखेर, नवं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधत तीन महत्त्वाच्या मुद्द्यावंर चर्चा केली. यावेळी त्यांनी नव्या सरकारला शुभेच्छा देत काही प्रश्नही उभे केले आहेत. (Uddhav Thackeray talked on this three important topic)

हेही वाचा – शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री अशक्य, नव्या सरकारबाबत ठाकरेंची ठाम भूमिका

एकनाथ शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री नाही

अडीच वर्षांपूर्वी मी हेच सांगितलं होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ. मात्र, त्यावेळी तुम्ही नकार का दिला. आणि आताच का तथाकथित सेनेचा मुख्यमंत्री केला? तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर महाविकास आघाडी स्थापनच झाली नसती. त्यामुळे हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे. शिवसेनेशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असं ठाकरे म्हणाले.

माझा राग मुंबईकरांवर काढू नका

माझ्यावर राग आहे ना तो माझ्यावर काढा. माझ्या पाठीत वार करा. पण मुंबईच्या काळजात कट्यार घुसवू नका. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याचं मला खरचं दुख होत आहे. ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, तिथे कोण्या बिल्डरला आंदन देत नाही आहोत. तिथे पर्यावरणासाठी आवश्यक जंगल आणि वनराई होती ती एका रात्रीत….. रात्रीस खेळ चाले हे त्याच आता ब्रीद वाक्य आहे, एका रात्री झाडांची कत्तल झाली. असा टोला त्यांनी लगावला आहे.
कृपया करून माझा राग पर्यावरणावर काढू नका, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, कांजुरमार्गचा जो प्रस्ताव दिला आहे त्यात कुठेही अहंकार नाही. मी मुंबईकरांच्या वतीने हात जोडून विनंती करतो, आरेचा जो काही आपला आग्रह आहे तो रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचेल. अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत. मधल्या काळात त्याही परिस्थितीत तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो काही छायाचित्रकारांनी काढलेला आहे, म्हणजे तिथे वन्यजीवन आहे. झाडं कापल्यामुळे तेथील वन्यजीवन संपल अस नाही, मला धोका हाच वाटतो की, आत्ता तुम्ही आरेचा भाग घेतल्यानंतर कालांतराने तिथे रहदारी सुरु झाल्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील वनजीवन हे धोक्यात येणार आहे, करता करता तिथे काहीच नाही काहीच नाही म्हणत मग आणखीन पुढे जाईल असं होणार नाही, पण जवळपास 800 एकर मुंबईतील जंगल आम्ही राखीव करून टाकलं आहे, असही उद्धव ठाकरे म्हणाले.

आरेचा जो निर्णय आहे तुम्ही कृपा करून रेटून घेऊ नका, कांजूरमार्गचा जो निर्णय आहे… आता वरती खाली सरकार तुमचेच आहे. जमीन कोणाची ही जमीन नागरिकांची आहे. आणि ही जमीन महाराष्ट्राच्या मुंबईच्या हितासाठी वापरा जेणेकरून आरेचा जो मर्यादीत वापर होणार होता. कांजुरला गेल्यानंतर… मी मागे आपल्याला बोललो होतो की, ती थेट अंबरनाथ, बदलापूरला जाऊ शकते. आरे कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, अशी विनंती त्यांनी मुंबईकरांच्या वतीने सरकारला केली आहे.

हेही वाचा – माझा राग मुंबईवर काढू नका, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, उद्धव ठाकरेंची विनंती

आपलं मत कुठे फिरतंय?

ते पुढे म्हणाले की, लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. या चार स्तंभानी पुढे येऊन लोकशाही वाचवली पाहिजे, अंसही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकशाही कोसळली तर काहीच अर्थ उरणार नाही, असंही ते पुढे म्हणाले. आपल्याकडे गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. आपण कोणाला मत केलंय हे कोणालाही कळत नाही. पण आपण कोणाला मतदान केलंय हे तरी आपल्याला कळायला हवं. तरच, मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल.

आता मी सेना भवनात आहे. म्हणजेच इथे माहिम विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील मतदाराने केलेलं मत सूरत, गुवाहाटी, गोवा येथे फिरून आलं. पण मतदारांना कळलंच नाही. त्यामुळे आपलं मत कुठून कुठे फिरतंय हेच मतदाराला कळत नाहीय, मग लोकशाही राहिली कुठे? असा प्रश्न उपस्थित करून ठाकरेंनी सद्य परिस्थितीवर भाष्य केलं.

First Published on: July 1, 2022 3:28 PM
Exit mobile version