ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना नोटीस पाठवून गुरुवारी त्यांची दिवसभर मुंबईतल्या कार्यालयात चौकशी केली. सुमारे ८ ते साडे ८ तास ही चौकशी केली. दिवसभर चाललेल्या या चौकशीदरम्यान पूर्णवेळ मनसेचे कार्यकर्ते सोशल मीडियावर राज ठाकरेंच्या समर्थनार्थ भूमिका मांडत होते. अखेर रात्री ८च्या सुमारास राज ठाकरे ईडीच्या कार्यालयातून बाहेर आले. याचीच परतफेड म्हणून मनसेनेच उलट ईडीला नोटीस पाठवल्याचं ट्वीट मनसेच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करण्यात आलं होतं. ईडीच्या कार्यालयावर लावलेल्या नामफलकासंदर्भात ही नोटीस बजावण्यात आल्याचं यात म्हटलं होतं. मात्र, अवघ्या काही तासांमध्येच हे ट्वीट डिलीट करण्यात आलं.
वास्तविक मनसेनं एका वृत्तवाहिनीच्या बातमीवर हे ट्वीट केलं होतं. मात्र, नंतर ही मागणी मनसेची नसून मराठी एकीकरण समितीने केली असल्याचं समोर आलं. त्यामुळे मनसेनं हे ट्वीट डिलीट करून नवीन ट्वीट केलं, ज्यामध्ये या सगळ्या गोंधळाचा खुलासा करण्यात आला आहे.
ईडी ह्या तपास यंत्रणेचा नामफलक मराठीत असावा अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.. ही मागणी मनसेने केल्याची बातमी एका वृत्तमाध्यमाने केली होती ती आम्ही प्रमाण मानली होती, पण त्यांनी बातमी अधिक अचूक केल्यावर आम्ही देखील मथळा अचूक करत आहोत https://t.co/PlVEahcdub
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 23, 2019
राज ठाकरे म्हणतात, ‘कितीही चौकशा करा, माझं तोंड बंद होणार नाही’
मराठी भाषा विभाग सक्ती करेल?
ईडीच्या मुंबईतल्या ऑफिसवर लावलेला फलक हा हिंदी आणि इंग्रजी भाषेत आहे. नेमका यावरच मनसेनं या ट्वीटमधून आक्षेप घेतला होता. ‘महाराष्ट्रातल्या सर्व शासकीय कार्यालयांचे फलक मराठीमध्येच असायला हवेत, पण ईडी बहुधा हे विसरलं असेल’, असा आक्षेप मनसेकडून घेण्यात आला आहे. यासंदर्भात ‘आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. या नोटिशीची प्रत ईडीला देखील पाठवण्यात आली आहे. आता मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकांची सक्ती करेल का?’ असा सवाल या ट्वीटमध्ये करण्यात आला होता. तसेच, मुख्यमंत्री कार्यालयाला देखील या ट्वीटमध्ये टॅग करण्यात आले होतं.
मनसेची ईडीला नोटीस!
महाराष्ट्रात शासकीय फलक हे मराठीत असायला हवेत, हे ईडी कार्यालय बहुदा विसरलं आहे पण आम्ही ह्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे,आणि ह्या नोटिशीची प्रत ईडीला पाठवली आहे. मराठी भाषा विभाग ईडीला मराठी फलकाची सक्ती करणार? @CMOMaharashtra pic.twitter.com/LcpvnaGhD2— MNS Adhikrut (@mnsadhikrut) August 23, 2019
राज ठाकरेंच्या चौकशी प्रकरणावर राज्यभरातल्या मनसे कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला होता. कळव्यामध्ये प्रवीण चौगुले नावाच्या एका तरुणाने तर याचा निषेध म्हणून आत्महत्या केल्याचं देखील बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी देखील सरकार सूडबुद्धीने या चौकशा करत असल्याची टीका केली होती. आधी पी. चिदम्बरम आणि नंतर राज ठाकरे यांची चौकशी करण्यात आल्यामुळे विरोधकांनी सरकारवर सरकारी संस्थांचा वापर राजकीय सूड उगवण्यासाठी केला जात असल्याची टीका केली होती.