पालकत्व ही मोठी जबाबदारी आहे.तुम्ही मुलांना जे काही वातावरण द्याल,जे संस्कार त्यांच्यावर कराल त्यानुसार मुलं घडतं असतात.ज्याचा त्यांच्या भविष्यावर दिर्घ परिणाम होतो. मुलं पालकांच अनुकरणं तर करतातच त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूच्या घटनांचाही त्यांच्यावर परिणाम होत असतो. मुलं अभ्यासात हुशार आहे म्हणून किंवा सुंदर आहे म्हणून त्याचे जर घरात नको तेवढे लाड होत असतील , त्याचे सगळेच हट्ट पुरवले जात असतील तर तुम्ही मुलांच नुकसान करत आहात हे समजून जा. कारण पालकांच्या याच गोष्टी मुलांना मूडी आणि हट्टी व अहंकारी बनण्यासाठी कारणीभूत ठरतात. आई वडिलांनी प्रेमापोटी मुलांना दिलेली ही स्पेशल ट्रिटमेंट असते. पण मुलं यामुळे स्वत:ला इतरांपेक्षा वेगळे समजू लागतात. त्यातून त्यांच्यात अहंपणा निर्माण होतो. भविष्यात त्यांचे नुकसान होऊ शकते.
भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्या
अशा मुलांना व्यवस्थित हाताळण्याचा पहिला मार्ग म्हणजे त्यांना त्यांचे विचार व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देणे. जेणेकरुन मुले त्यांच्या भावना तुमच्याशी शेअर करू शकतील.
प्रत्येक क्षणी बदलणाऱ्या मूडमागे मुलांच्या आत दडपलेल्या भावना असू शकतात. शांतपणे बसून त्यांच्याशी बोलल्याने त्यांना बरे वाटेल आणि हा सराव तुमच्यासाठीही चांगला होईल.
हायपर होऊ नका
अशा मुलांच्या अहंकारी आणि हट्टी स्वभावामुळे तुमचा मूड खराब करू नका. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जास्त प्रतिक्रिया न देणे. त्यांच्या काही क्रियाकलापांमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, परंतु त्यांना मारणे हा त्यांना शांत करण्याचा मार्ग नाही. यामुळे ते आणखी हट्टी होऊ शकतात. कोणत्या गोष्टींमुळे त्यांचा मूड खराब होतो आणि त्यांना राग येतो हे ओळखण्याचा प्रयत्न करा.
घरातील वातावरण सकारात्मक ठेवा
अनेक वेळा कौटुंबिक वातावरणही मुलांच्या अशा स्वभावाला कारणीभूत असते. घरात रोजच भांडणे होत असतील, कोणी कोणाशी नीट बोलत नसेल, शिवीगाळही होत असेल, तर मुलाचा राग, चिडचिड होणे स्वाभाविक आहे. याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. याला सामोरे जाण्यासाठी घरातील वातावरण सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा.
नात्यातील प्रेम आणि आपुलकी, मोठ्यांचा आदर, एकत्र राहण्याची सवय मुलांच्या चांगल्या संगोपनात खूप योगदान देते. यामुळे शक्यतो सगळं कुटुंब एकत्र राहील असा प्रयत्न करा.