बदलत्या काळानुसार लोकांची आयुष्य जगण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे. काही वर्षाआधी लोक एकत्र कुटूंबात राहत होते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे मुलांचे संगोपन चांगल्या रीतीने होत असे. मात्र, आजची स्थिती वेगळी आहे. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे मुलांचे संगोपन, पालन-पोषण यासर्वांवर परिणाम होत आहे. पालक जर नोकरी करणारे असतील तर मुलांचा योग्य आणि सुरक्षेतीपणे सांभाळ केला जाणे ही मोठी समस्या बनली आहे.
आज बहुतांश पालक कामाला जात असल्याने मुलांना पाळणाघरात ठेवलं जात आहे. सकाळी कामाला जाताना मुलांना पाळणाघरात सोडलं जाते आणि कामावरून येताना घरी आणण्यात येते. कितीतरी मुलांचा पाळणाघरात विकास उत्तमरीत्या होतो तर काही मुलांवर याचा विपरीत परिणाम दिसून येतो. आजकाल आपण अशा अनेक घटना पाहतो जिथे पाळणाघरात मुलांबाबत अनुचित घडत आहे. त्यामुळे मुलांसाठी पाळणाघराची निवड करताना पालकांनी योग्य ती खबरदारी घेण्याची गरजेचे आहे.
लक्षात घ्या या गोष्टी –
- पाळणाघर सुरु करणाऱ्या व्यक्तीपासून तेथील मदतनीस, सफाई कर्मचारी यांची माहिती पालकांनी घ्यावी. शिवाय ते प्रशिक्षित आहेत का नाही यांची माहिती जाणून घ्या.
- मुलांचा सांभाळ करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे पाळणाघरातील वातावरण कसे आहे ? तेथील स्टाफ मायेने वागणारा आहे का नाही? हे नक्की तपासा.
- मुलांना खेळण्या-बागडण्यासाठी हवेशीर आणि मोकळी जागा आवडते. तुम्ही निवडलेले पाळणाघर तसेच असायला हवे. तरच तुमचे मूल तेथे रमू शकेल नाहीतर मुलाच्या मनावर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
- मुलांच्या सर्वागीण विकासासाठी ॲक्टिव्हिटीज महत्वाच्या असतात. त्यामुळे तुम्ही निवडलेल्या पाळणाघरात कोणत्या ऍक्टिव्हिटी होतात याची आधीच माहित घ्या.
- निवडलेल्या पाळणाघरात वीज, पाण्याची व्यवस्था कशी आहे, स्वच्छ व नीटनेटकेपणा पाळणाघरात आहे का नाही हे जाणून घ्या कारण जर पाळणाघर अस्वच्छ असेल तर मुलाच्या आरोग्यासाठी ते हानिकारक ठरू शकते.
- मुलांना पाळणाघरात पौष्टीक आणि ताजे अन्न मिळत आहे का नाही हे नक्की तपासा. मुलांच्या वाढीसाठी मुलांना पौष्टिक अन्नाची गरज असते. मूल वारंवार आजारी पडत असेल तर एकदा तेथे मिळणाऱ्या अन्नाची पाहणी करा.
- लहान मुले म्हटले की डोळ्यासमोर सुरक्षिततेचा मुद्दा पहिला उभा राहतो. त्यामुळे निवडलेल्या पाळणाघराची जागा, तेथील खिडक्या किंवा इतर गोष्टी, तेथे काम करणाऱ्या व्यक्ती मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत ना याची खातरजमा करा.
पालकांनी या गोष्टी अवश्य कराव्यात –
कामावरून आल्यावरून कितीही कंटाळा आला, तुम्ही कितीही थकले असाल तरी मुलांसोबत वेळ घालवा. मूल पाळणाघरात काय शिकले ? तेथे त्याला आवडते का नाही? हे जाणून घेण्याचा प्रयन्त करा. मुलाचे उत्तर समाधानी नसेल तर पाळणाघरी जाऊन तुम्ही क्रोस चेक करायला हवे.
जेव्हा मूल पाळणाघरातून घरी येईल तेव्हा त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नाही ना याची खात्री करा. हल्ली बऱ्याच पाळणाघरात मूल ऐकत नसेल तर अनुचित घटना घडत आहे. त्यामुळे पालकांनी मुलाकडे यासंदर्भात चौकशी करणे ही पालकांची जबाबदारी आहे.
Edited By – Chaitali Shinde
हेही पहा : मुलं वाढवताना पालकांनी काय करावं ?