हल्लीच्या महागाईच्या दिवसात मुलांना उत्तम राहणीमानाबरोबरच योग्य शिक्षण देण्यासाठी पती पत्नी अशा दोघांना नोकरी करणं गरजेचे झाले आहे. यामुळे मुलांचा अर्धा दिवस शाळेत आणि उरलेला वेळ कधी आजी आजोबांबरोबर किंवा पाळणाघरात जातो. परिणामी मुलांना आई वडिलांचा सहवास कमी लाभतो.
तर दुसरीकडे दिवसभर ऑफिसमध्ये काम करुन पालक थकलेले असतात. यामुळे संध्याकाळी घरी आल्यावर मुलांबरोबर वेळ घालवण्याचीही उर्जाही त्यांच्यात उरलेली नसते. यामुळे बऱ्याचवेळा मुलं तर नाराज होतातचं पण मुलांना वेळ देता येत नसल्याने पालकही खजिल होतात.
ऑफिसच्या वेळा, लोकल, बसच्या वेळा, मुलांची शाळा, ट्युशन, क्लासच्या वेळा हे रोजचे रुटीन असल्याने त्यात फार काही फेरफारही करता येत नाही. यामुळे इच्छा असूनही मुलांसाठी वेळ काढता येत नाही असे पालकांचे म्हणणे असते. पण खरं तर यावर पालकांनीच तोडगा काढणे अपेक्षित असते.
त्यासाठी सर्वप्रथम पालकांनीच मुलांबरोबर काही गोष्टी शेयर करायला हव्यात. जेणेकरुन पालक आपल्यासाठीच कष्ट करत आहेत हे मुलांना कळेल.त्यामुळे पालकांबद्दल त्यांच्या मनात आदर वाढेल. शिवाय मुल समजूतदारही होतील. जे त्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त आहे. मुलं स्वावलंबी होतील, जेणेकरून भविष्यात ते कोणावरही अवलंबून राहणार नाहीत.
तसेच पालकांनीही रोजच्या धबडग्यातून रोज रात्री झोपण्यापूर्वीचा एक तास मुलांबरोबर मोकळा संवाद साधावा. तर कधी कॅरम खेळावा. कधी एकत्र बसून टिव्ही पाहावा. एखाद्या विषयावर चर्चा करावी. त्यामुळे पालक आणि मुलांमध्ये बॉंडींग वाढते. मुलांना देखील वेळेचे महत्व कळेल आणि पालकांनाही मुलांच्या गरजा कळतील. त्यामुळे कोणी कोणास वेळ देऊ शकत नाही याची खंतही वाटणार नाही.