अलीकडच्या धावपळीच्या काळात आपल्या शरीराचं संतुलन ठेवणं खूप महत्वाचं आहे. फास्ट फूड, बाहेरचं खाणं यामुळे लहान वयातच अनेकांना काही ना काही शारिरीक त्रास सुरु होतात. मात्र, यासाठी नियमीत तुमच्या डाएटमध्ये फळांचा जास्तीत जास्त समावेश करणं गरजेचं आहे. फळांमध्ये आपल्या शरीरासाठी लागणारे अनेक आवश्यक सत्त्व असतातच मात्र, त्यापेक्षाही त्याच्या सालींमध्ये देखील जास्त जीवनसत्त्व असतात.
या फळांच्या सालींमध्ये आहे जीवनसत्त्व
अनेकजण फळांचे सेवन करताना साली काढून टाकतात. साल काढून फळं खाल्ल्यास त्यातील जीवनसत्त्व मिळत नाहीत. काही फळांच्या साली या फळांपेक्षाही शरीरासाठी जास्त पौष्टीक असतात.
काकडी
उन्हाळ्यात लोक जास्त प्रमाणात काकडी खातात. पण काकडीची सालं काढून खाणं जास्त लोकांना आवडतं. मात्र, काकडीच्या सालांमध्ये जास्त सत्त्व असतात. वास्तविक काकडीची साल अनेकदा खायला कडू लागते. त्यामुळे काकडीची साल काढून काकडी खाल्ली जाते. पण बऱ्याच काकडीची साल हे कडू नसते. अशावेळी काकडी सालासकट खावी.
सफरचंद
अनेकजण सफरचंदाची साल देखील काढून खातात. मात्र, यामुळे सफरचंदामधील फायबर आणि आवश्यक पोषक तत्त्व निघून जातात. त्यामुळे सफरचंद हे नेहमी साल न काढता खावे. तसेच सफरचंद नेहमी कापून न ठेवता कापल्यानंतर लगेच खावे.
पेरू
पेरूच्या आतील गरापेक्षा सालीला जास्त चव असते. पण काही लोक पेरूची साल काढून पेरू खातात. पेरूच्या सालीमध्ये असणारे पोषक तत्त्व शरीराला मिळण्यासाठी सालीसकट पेरू खाणं गरजेचं आहे.
द्राक्ष
द्राक्ष तयार होत असताना त्यावर बऱ्याच किटकनाशकांचा उपयोग केला जातो. त्यामुळे द्राक्ष खाताना लोक त्याची साल काढून खातात. पण द्राक्षाच्या सालीमध्ये रिझर्व्हेट्रॉल तत्त्व असतं. त्यामुळे द्राक्षाची सालं कधीही काढून खाऊ नये. त्यापेक्षा द्राक्ष स्वच्छ धुवून घ्यावीत आणि त्यानंतर त्याचं सेवन करावं.
पेर
पेरची साल देखील पौष्टीक असते. त्यामुळे पेर हे फळदेखील सालीसकट खाणं नेहमी चांगलं असतं.