दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे घरोघरी फटाके, मिठाई, दिवे याची खरेदी केली जाते. बाजारात विविध प्रकाराची, आकाराची मिठाई मोठ्या प्रमाणात विक्री करतात. पण याच दरम्यान तुमची एक चुक तुमचे आरोग्य बिघडवू शकते. जेव्हा मार्केटमध्ये मिठाई खरेदी करण्यासाठी जाता तेव्हा काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. जेणेकरुन तुम्ही आनंदात आणि सुरक्षित दिवाळी साजरी करू शकता.
बनावट मिठाईपासून दूर रहा
बाजारात मिठाई खरेदी करण्यासाठी जात असाल तर तुम्हाला तेथे विविध रंगी मिठाई दिसेल. सुंदर दिसणाऱ्या या मिठाई पासून दूरच रहा. कारण अशा मिठाईमुळे एलर्जी, किडनी संबंधित समस्या, श्वसनासंबंधित समस्या होऊ शकतात. सणासुदीला अशा मिठाईमुळे तुमचे आरोग्य बिघडले जाऊ शकते.
मिठाईवरील चांदीच्या वर्खाकडे पहा
मार्केटमध्ये बहुतांश मिठाईवर चांदीचा वर्ख लावला जातो. तो मिठाईकडे आकर्षित करण्यासाठीच असतो. मिठाईवरील वर्ख हा खरंच चांदीचा आहे का याबद्दल तुम्हाला शंका वाटत असेल तर त्याला स्पर्श करून पहा. कारण आजकाल मार्केटमध्ये मिठाई अधिक आकर्षक दिसावी म्हणून चांदी ऐवजी अॅल्युमिनिअमचा वर्ख लावला जातो. जो आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
भेसळयुक्त माव्यापासून दूर रहा
सणासुदीच्या काळात भेसळयुक्त माव्याचा सर्रास वापर केला जातो. जो आपल्या आरोग्याला नुकसान पोहचवू शकतो. दिवाळीच्या वेळी मिठाई खरेदी करताना एखाद्या उत्तम दुकानातूनच खरेदी करावी. माव्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भेसळयुक्त मिल्क पावडरमुळे तुमचे आरोग्य बिघडले जाऊ शकते. जर तुम्हाला माव्यात भेसळ आहे हे कळत नसेल तर त्यावर आयोडीचे दोन-तीन थेंब टाकून पहा. जर मावा निळ्या रंगाचा झाल्यास तर समजून जा त्यात भेसळ आहे. प्रयत्न करा की, दिवाळीच्या दिवशी घरीच मिठाई तयार करा.