दिवसभर व्यस्त जीवन आणि कामाच्या दरम्यान मन तणावमुक्त आणि शांत ठेवणे खूप महत्वाचे आहे. तुमचे मन जितके शांत असेल तितके ते स्मार्ट निर्णय घेण्यास सक्षम असेल. अनेकदा कठीण परिस्थितीमध्ये मन शांत ठेवणं फार कठीण होऊन जातं. मन शांत असल्यास तुम्ही अनेक गोष्टींवर विजय मिळवू शकतात. तर मग जाणून घ्या मन एकाग्र आणि शांत करण्यासाठी काय केलं पाहिजे.
कोणतेही महत्त्वाचे काम करताना किंवा अभ्यास करताना एकाग्रता भंग करणा-या घटकांपासून नेहमीच दूर राहावे. उदाहरणार्थ टीव्ही, संगीत यासारखी उपकरणे किंवा अधिक गजबजलेल्या जागेची निवड करू नये, कारण यामुळे लक्ष जास्त विचलित होते.
मित्रांशी बोला, फिरायला जा
तुमचं मन खूप अस्वस्थ होत असेल, तर तुम्ही अशा वेळी तुमच्या मित्रांशी संवाद साधणं महत्त्वाचं आहे. तसंच मित्रांसोबत, कुटुंबासोबत कुठेतरी फिरायला जा. तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थ खा. यामुळे तुमचे मन शांत होण्यास नक्की मदत होईल.
नियमित योगा करा
जर तुमचं मन सातत्यानं खूप अस्वस्थ होत असेल, तर तुम्ही दररोज योगा करणे फायदेशीर ठरू शकते. योगा केल्यानं तुमचा अर्धा ताण दूर होतो, तुम्ही योगाला दररोज किमान 30 मिनिटं द्या, त्याचा तुम्हाला खूप फायदा होईल.
संगीत ऐकणे
संगीतामुळे आपला मूड आणि भावना खूप सुधारतात. हे आपल्याला आनंदी ठेवण्यास मदत करते. दिवसातून काही वेळ संगीत ऐकल्यास तणाव कमी होतो आणि मनाला आराम मिळतो. अनेक संशोधनांमध्ये असेही दिसून आले आहे की, संगीतामुळे मूड बदलतो.
सकारात्मक विचार करा
मन शांत राहावं, यासाठी आपले विचार नेहमी सकारात्मक असणे महत्त्वाचे आहे. कुठल्याही चुकीच्या गोष्टींचा विचार करू नका. नकारात्मक विचार नेहमी टाळा. तुमच्या मनात सकारात्मक विचार हवेत, त्यामुळे तुमचं मन शांत व प्रसन्न राहील.
एकाच वेळी एकच काम करा
एकाचवेळी अनेक गोष्टी केल्याने कोणतेही काम नीट होत नाही हे लक्षात ठेवा. एक काम पूर्ण झालं की मग दुसरं काम हाती घ्या. कठीण प्रसंगी हा नियम पाळणे अतिशय महत्त्वाचे आहे. एकाचवेळी अनेक गोष्टींमध्ये मन गुंतवल्यास कोणत्याही एका कामावर तुम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. म्हणजे आधीच वाईट असलेली परिस्थिती अधिकच वाईट होईल.
हेही वाचा : Jungle Saffari -जंगल सफारीला जाताना या गोष्टी सोबत हव्याच
________________________________________________________________________
Edited By : Nikita Shinde