भारत हा देश विविध संस्कृतींनी परंपरांनी नटलेला आहे. या ठिकाणी विविधतेत एकता पाहायला मिळते. अशातच आता होळीच्या सणाची चाहूल लागली. ‘ देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक आहे. पहिल्या दिवशी होलिका दहन होते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते. फाल्गुनी पौर्णिमेपासून पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसांत कुठे 2 दिवस तर कुठे पाचही दिवस हा उत्सव साजरा केला जातो. जाणून घेऊया होळी कशी साजरी केली जाते पूजाविधी, महत्व आणि मान्यता.
होळीची कहाणी
जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यप आणि विष्णू भक्त प्रल्हादाची कथा आपल्या सर्वांना माहीतच आहे. पौराणिक मान्यतेनुसार हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने आपल्या मुलाचा आठ दिवस अनन्वित छळ केला होता. परंतु, भगवान विष्णूची प्रल्हादावर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादाची आत्या होलिका तिच्या मांडीवर प्रल्हादास घेऊन जळत्या अग्नीत बसली होती. होलिकाला अग्नीने न जाळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतू, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादाचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिकाच मरण पावली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या घटनेनंतर वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याने होलिका दहनाचा हा उत्सव देशभरात साजरा होऊ लागला. अशीच शिव पार्वती, कामदेव यांची देखील कथा आहे.
होलिका दहनाचे महत्त्व
होलिका दहनाचे पौराणिक आणि सांस्कृतिक महत्त्व आपल्याला माहिती आहे. होळी दहनामुळे प्रज्वलित झालेला अग्नी माणसाच्या शरीराला उष्णता प्रदान करत असतो. थंडीमुळे सुस्त झालेल्या शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते. वसंत ऋतू मध्ये होळी खेळली जाते जी हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या आगमनाच्या कालावधी दरम्यान असते. होलिका जळाल्यावर जवळपासच्या भागाचे तापमान सुमारे 50-60 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढते. जेव्हा लोक होलिका दहन होताना होळीला प्रदक्षिणा घालतात तेव्हा उष्णतेमुळे शरीरातील जीवाणू नष्ट होतात आणि शरीर शुद्ध होण्यास मदत होते. देशाच्या काही भागात होलिका दहनानंतर लोकं कपाळावर त्याची राख लावतात. तर, दुसऱ्या दिवशी एकमेकांच्या अंगावर रंगांची उधळण करून हा सण आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषाने साजरा केला जातो.
होलिका दहनाचा पूजाविधी
होलिका दहन करण्यापूर्वी तिचे पूजन करण्यात येते. होलिकेजवळ जाऊन पूर्व किंवा उत्तरेकडे मुख करून बसून पूजा करण्यात येते. होलिकेस चारही बाजूने तीन किंवा सात फेर धरून कच्च्या धाग्याने बांधण्यात येते. शुद्ध पाणी व अन्य पूजा साहित्य एक एक करून होलिकेस समर्पित करण्यात येते. पूजेनंतर पाण्याने अर्घ्य देण्यात येते. एक कलश पाणी, अक्षता, गंध, पुष्प, गूळ, साबुदाणा, हळद, मूग, बत्तासे, गुलाल, नारळ, पुरणपोळी इत्यादींची आहुती देण्यात येते. नवीन धान्याचा अंश जसे, गहू, चणे इत्यादींच्या लोंबी यांचीही आहुती देण्यात येते. होलिकेची पूजा केल्यानंतर तिचे दहन केले जाते. होलिका दहन नेहमी भद्रे नंतरच करावे. चतुर्दशी किंवा प्रतिपदा तिथी असताना होलिका दहन करण्यात येत नाही. सूर्यास्तापूर्वी सुद्धा होलिका दहन करू नये. होलिकेच्या अग्नीत भाजले गेलेले पदार्थ खाल्ल्याने व्यक्ती निरोगी राहते. होळीतून निर्माण झालेली राख दुसऱ्या दिवशी सकाळी घरी आणल्यास घरातील नकारात्मक शक्तींचा नायनाट होतो, अशी मान्यता आहे.