गणेशोत्सवाच्या काळात बाप्पाला प्रिय असणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना अर्पण केल्या जातात. या मध्ये दुर्वां, जास्वंदीचे फुल, मोदक, केळी यांसारख्या अनेक गोष्टी आहेत. मात्र, बाप्पाच्या पूजेमध्ये कधीही तुळशीचा वापर केला जात नाही. असं म्हणतात बाप्पाच्या पूजेमध्ये तुळस वर्ज्य मानली जाते. पण यामागे नक्की काय कारण आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बाप्पाला तुळस वर्ज्य का?
आपल्याकडे तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. श्री कृष्णाला तुळस अत्यंत प्रिय आहे. मात्र, श्री गणेशाला तुळस वर्ज्य आहे. खरंतर, यामागे एक पौराणिक कथा आहे.
पौराणिक कथेनुसार, श्री गणेश एकेदिवशी गंगा नदीच्या काठी तपस्या करत होते. त्याचवेळी तीर्थ यात्रेसाठी निघालेली तुळस गंगा काठी पोहोचली. श्री गणेशांना तपश्चर्येच मग्न पाहून देवी तुळस मोहित झाली आणि तिच्या मनात श्री गणेशांसोबत विवाह करण्याची इच्छा उत्पन्न झाली. त्यावेळी तुळशीने श्री गणेशांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या पुढे लग्नाचा प्रस्ताव मांडला. मात्र, गणेशांनी तो नाकारला. लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यामुळे तुळशीने श्री गणेशांना तुमचे एक नाही तर दोन लग्न होतील असा शाप दिला.
त्यावेळी संतप्त झालेल्या श्री गणेशांनी देखील तुझा विवाह राक्षसासोबत होईल असा शाप तुळशीला दिला. तसेच माझ्या पूजेमध्ये तुझा वापर वर्ज्य असेल असे देखील त्यांनी सांगितले. तेव्हापासून बाप्पाच्या पूजेत तुळशीचा वापर केला जात नाही.