मुंबई, महाराष्ट्रासह संपूर्ण देशात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. गणेश चतुर्थीनिमित्त लोकांच्या घरोघरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होऊ लागलं आहे. घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळात गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.गणेशोत्सवाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याही मराठमोळ्या स्टाईलमध्ये. (PM Narendra Modi wishes Ganesh Chaturthi to Maharashtratians in Marathi )
पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट काय?
सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा , गणपती बाप्पा मोरया!, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. तसंच, गणपती बाप्पाचं दर्शन घेतानाचा एक फोटोदेखील मोदी यांनी शेअर केला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते त्यावेळी त्यांनी पुण्यातील दगडू गणपती मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी काढलेला फोटो मोदी यांनी ट्वीटरवर शेअर केला आहे.
सर्व देशवासीयांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया! pic.twitter.com/iaDSrS0JyA
— Narendra Modi (@narendramodi) September 19, 2023
ठाकरे गटाच्या खोचक शुभेच्छा
हूल’ आणि ‘भूल’ ही सध्याच्या राज्यकर्त्यांची प्रमुख शस्त्रे आहेत. त्यांचा वापर करीत जनतेला एका वेगळ्याच भुलभुलैयात ठेवण्याचा उद्योग नऊ वर्षांपासून सुरू आहे. 2024साठीही त्यांचा तोच प्रयत्न आहे. मात्र या नऊ वर्षांच्या सत्तेने आपल्याला फक्त ‘कळा’च दिल्या, हे आता जनतेला समजले आहे. त्यामुळे 2024मध्ये देशात परिवर्तन घडवून आणायचेच, असा निश्चय जनतेने मनाशी केलाच आहे. ‘गणराया, देशात वाढलेला दंभ आणि सुंभ, जनतेची इडापीडा नष्ट कर आणि लोकशाहीवरील विघ्न दूर कर!’ अशीच प्रार्थना तमाम गणेशभक्तदेखील आज घरोघरी विराजमान झालेल्या बाप्पांच्या चरणी करीत असतील, असा निशाणा ठाकरे गटाने साधला आहे.
विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीची वज्रमूठ 2024मध्ये आपला सफाया करणार याची जाणीव झालेले राज्यकर्ते आणि त्यांचे भक्त यांना ‘इंडिया नव्हे भारत’ची उचकी लागली आहे. ‘चांद्रयान-3’ मोहिमेपासून ‘जी-20’ परिषदेपर्यंत तथाकथित जागतिक यशाचा ‘क्लोरोफॉर्म’ जनतेला देण्याचे उद्योग होत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात करण्यात आली आहे.
महागाई, बेरोजगारी आणि इतर संकटांनी गांगरलेल्या देशवासीयांना धर्म आणि श्रद्धेच्या गुंगीत गुंतविण्याचे कारस्थान सुरू आहे. त्यासाठी अयोध्येतील श्रीराम मंदिरापासून समान नागरी कायदा, ‘एक देश – एक निवडणूक’ अशा अनेक गोष्टींची ‘हूल’ दिली जात आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.