श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला कृष्णाष्टमी साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार, यादिवशी मध्यरात्री श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. श्री कृष्ण हा भगवान विष्णूंचा आठवा अवतार मानला जातो. श्री कृष्णांच्या विविध लिलांच्या अनेक कथा पौराणिक ग्रंथामध्ये लिहिल्या आहेत. यंदा हा उत्सव 6 आणि 7 सप्टेंबर रोजी साजरा केला जाणार आहे. या दिवशी उपवास, भजन-कीर्तन केले जाते.
कृष्ण जन्माष्टमीचे महत्व
जन्माष्टमीचा सण सर्व देशात अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. कृष्णाष्टमीच्या दिवशी उपवास करून रात्री 12 वाजता किंवा रोहिणी नक्षत्राचा उदय झाला की, कृष्णजन्माचा उत्सव साजरा करतात. तिथीनुसार श्रीकृष्णाचा जन्म हा श्रावण वद्य अष्टमीला मध्यरात्री, रोहिणी नक्षत्रावर चंद्र वृषभ राशीत असताना झाला होता. गोकुळाष्टमीला दिवसभर उपवास करून रात्री 12 वाजता श्रीकृष्णाला पाळण्यात घालून हा सण साजरा केला जातो. त्यानंतर प्रसाद घेऊन उपवासाचे पारण केले जाते.
श्री कृष्ण जन्माची कथा
द्वापर युगात मथुरा नगरीत राजा उग्रसेनचे राज्य होते, त्याचा पुत्र कंस शूर, प्रतापी आणि अत्यंत क्रूर होता. स्वत:ला देव म्हणून घोषित करून, त्याने त्याची पूजा करून घेण्यास सुरुवात केली आणि जे लोक त्यांना देव मानत नाहीत त्यांना शिक्षा करण्यास सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला या गोष्टींपासून रोखल्यावरही त्याने वडिलांना देखील तुरुंगात टाकले. कंसाच्या अत्याचाराने दुःखी झालेल्या देवी-देवतांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि नंतर भगवान विष्णूची विनंती केली.
त्यावेळी भगवान विष्णू म्हणाले की, मी लवकरच वासुदेवाची पत्नी आणि कंसाची बहीण देवकीच्या पोटी जन्म घेईन. वासुदेव आणि देवकीच्या लग्नानंतर निरोपाच्या वेळी आकाशवाणी झाली. त्यावेळी आकाशातून आवाज आला, “अरे कंसा, तुझ्या बहिणीचा आठवा मुलगा तुझ्या मृत्यूचे कारण बनेल.” यानंतर कंस संतप्त झाला आणि त्याने दोघांनाही तुरुंगात टाकले. देवकीच्या सात मुलांचा कंसाने वध केला आणि श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्रीकृष्णाचा जन्म झाला. भगवान श्रीकृष्णाचा जन्म होताच, भगवान विष्णू स्वत: तुरुंगात प्रकट झाले आणि त्यांनी वासुदेवाला त्यांचे मित्र नंद यांच्याकडे घेऊन जाण्यास सांगितले.