लहान मुले एखादया गोष्टीसाठी कधी कधी इतकी हट्टीपणाने वागतात की, त्यांना समजावून सांगणे कठीण होते. अशावेळी पालक मुलांना ओरडतात तरी किंवा त्याच्यावर हात तरी उचलतात. मात्र, मानसोपचारतज्ञांच्या मते, मुलांना ओरडल्याने किंवा त्यांच्यावर हात उचलल्याने परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अशाने मुलं पालकांची आज्ञा पाळण्याऐवजी स्वतःला पालकांपासून दूर ठेवतात. पालकांपासून मुले गोष्टी लपवू लागतात. त्यामुळे मुलांना वळण लावताना पालकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे असते.
मुलांचे म्हणने एकणेही गरजेचे – हट्टी मुलांचे पालकांनी न ऐकल्यास अशी मुले आणखीनच विचित्र वागू लागतात. अशावेळी पालकांनीही मुलाशी त्याच स्वरात बोलले तर मुले आणखीनच हट्ट करू लागतात. इतकंच काय तर त्यांचा हट्ट पूर्ण न झाल्यास मुले पालकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागतात. अशावेळी पालकांनी मुलांचे म्हणणे संयमाने ऐकणे गरजेचे आहे.
मुलांच्या वागणुकीवर रिऍक्ट होऊ नका – जर तुमचे मुलं काही चांगले काम करत असेल तर पालकांनी अवश्य त्याचे कौतुक करावे. पण, जर मुलं काही चुकीचे करत असेल किंवा हट्टीपणा करत असेल तर त्यावर पालकांनी रिऍक्ट होणे टाळावे. अशावेळी ओरडण्यापेक्षा तुमच्या गप्प बसण्याचा मुलावर जास्त परिणाम होऊ शकतो. आई बाबा दोघेही आपल्याशी बोलत नाही हे पाहून मुले तुम्हाला स्वतःहून सॉरी बोलायला येऊ शकतात.
मुलांना प्रेमाने समजवा – मुलांना कितीही ओरडले किंवा त्यांच्यावर रागावले, आरडाओरडा करून त्यांना समजावून सांगण्याचा प्रयन्त केला तर त्यांचा हट्टीपणा आणखीनच वाढू शकतो. अशाने मुलांच्या मेंदूवर आणि मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी मुलांना नेहमी प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयन्त करा. त्यांची वागणूक बदलून त्यांना योग्य वळण लावण्यासाठी ही पद्धत अतिशय परिणामकारक ठरू शकते.
खोट्या धमक्या देऊ नका – अनेक पालकांना सवय असते खोट्या धमक्या देण्याची, जसे की तू हे केलं नाहीस तर मी तुला बाहेर नेणार नाही,मोबाईल देणार नाही. पण अशा धमक्या ना पालक सिरियसली घेत ना मुले आणि कुठेतरी मुलांना त्याची सवय होते. अशाने मुलांना वाटू लागते की, पालक केवळ ओरडतात, बाकी काही करत नाही. त्यामुळे तुम्हाला अशी सवय असेल तर ती आजच सोडा. मुलांना प्रेमाने समजविण्याचा प्रयन्त करा अशाने मुले अधिक चांगल्या पद्धतीने वागू लागतील.
हेही वाचा : मुलं पालकांचं का ऐकत नाहीत? ही आहेत कारणे