Saturday, May 4, 2024
घरमानिनीReligious'या' मंदिरात भाऊ-बहीणींना एकत्र दर्शनाला नो एन्ट्री

‘या’ मंदिरात भाऊ-बहीणींना एकत्र दर्शनाला नो एन्ट्री

Subscribe

लाखोजू श्रीनिवास- आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेवर असं एक मंदिर आहे,  तिथे भाऊ-बहीण एकत्र दर्शनाला जाऊ शकत नाहीत. त्या मंदिराचं नाव प्राचीन राधा वेणूगोपाल स्वामी मंदिर. आंध्र-ओडिशा सीमेवर श्रीकाकुलम जिल्ह्याच्या मेलियापुट्टीमध्ये हे मंदिर आहे. राधा वेणूगोपाल स्वामी मंदिराला आंध्रचं खजुराहो मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. मंदिराची निर्मिती आणि मूर्तीकला यामध्ये सौंदर्यशास्त्रातील अनेक खास वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळेच या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. या भागातील अनेक नवविवाहित जोडपी त्यांच्या पहिल्या रात्रीपूर्वी आधी या मंदिराला भेट देऊन पूजा करतात.

कलिंगा स्थापत्य शैलीतील मंदिर
राधा वेणूगोपाल स्वामी मंदिर मेलियापुट्टीच्या मुख्य मार्गावर स्थित आहे. रस्त्यावरुन पाहिलं असता दोन्ही कमानींमधून हे मंदिर अत्यंत सुंदर दिसतं. त्या कमानींमधून पुढं विशाल प्रांगणात प्रवेश करताना मंदिराच्या गर्भगृहापर्यंत जाणाऱ्या दगडी पायऱ्यांपासून सुरू झालेला परिसर अत्यंत सुंदर मूर्तींनी भरलेला आहे.
मंदिराच्या चारही बाजूला असलेल्या भींतींवर विविध दगडांमध्ये कोरलेल्या मूर्ती पाहायला मिळतात. तर मंदिराच्या छतावर कोरलेल्या फुलांच्या आकृती सारख्याच वाटतात. पण जवळून पाहिल्यानंतर त्यातही पूर्णपणे वेगळेपणा जाणवतो. बीबीसीची टीम याठिकाणी पोहोचली तेव्हा तिथे कोणीही भाविक नव्हते. मंदिरात येणारे भाविक शक्यतो दर्शनानंतर मंदिरातील पुजाऱ्यांना मूर्ती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांबाबत विचारतात. मंदिराचे मुख्य पुजारी गोपीनाथ यांनी याबाबत बीबीसीला माहिती दिली. मंदिराची रचना कलिंगा स्थापत्य शैलीतील असून मंदिराची निर्मिती 1840 मध्ये झाली असल्याचं ते म्हणाले.

- Advertisement -

महाराणी उत्तरा यांनी बांधलं होतं मंदिर
मंदिराच्या इतिहासाबाबत मुख्य पुजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1840 च्या दशकात मेलियापुट्टी परिसर पारलामिकीडीचे महाराज वीरवीरेंद्र प्रताप रुद्र गजपती नारायण देव यांच्या प्रशासनाच्या अधिपत्याखाली होता.
पुजारी गोपीनाथ म्हणाले की, “महाराणी विष्णूप्रिया यांनी महाराजांना मूर्तीकलेचा प्रसार होऊन याचं सौंदर्य वाढावं म्हणून एक मंदिर बांधण्याची विनंती केली. त्यांच्या इच्छेनुसार त्याठिकाणी मंदिर बांधण्यात आलं.
“मंदिराच्या निर्मितीसाठी महाराजांनी पुरी, ओडिशा मधून शिल्पकारांना बोलावलं. मंदिरात येणाऱ्या लोकांना 64 कलांची माहिती व्हावी म्हणून मंदिरात मूर्ती तयार करण्यास त्यांना सांगण्यात आलं.” त्यामुळं शिल्पकारांनी 64 कलांची माहिती देण्यासाठी कोरीव काम करून मूर्ती याठिकाणी आणल्या. त्यानंतर मंदिराच्या चारही भिंतीवर त्या मूर्ती ठेवण्यात आल्या आणि नंतर मंदिराचं बांधकाम सुरू झालं, असं गोपीनाथ रथ म्हणाले.

‘भाऊ-बहीण एकत्र येत नाही’
गोपीनाथ असंही म्हणाले की, “एकाच कुटुंबात जन्मलेले किंवा विशेषतः भाऊ बहीण या मंदिरात येत नाहीत. मंदिरांच्या भींतींवर लैंगिक मुद्रांमधील मूर्ती आहेत. त्यामुळं मंदिरात येणाऱ्या तरुण-तरुणींना काहीसं विचित्र वाटतं. तसंच बहीण-भावांनाही मंदिरात आल्यानंतर लाज वाटते.” त्यामुळं एकदा असं म्हटलं गेलं होतं की, बहीण-भावाने एकत्र मंदिरात जाऊ नये. त्यामुळ अनेक तरुण तरुणी स्वामीच्या पूजेसाठी बाहेर जातात. “मंदिरात सेक्सशी संबंधित खूप मूर्ती होत्या. त्यामुळं काही निर्बंध होते. पण सध्या असे काहीही नियम नाहीत. “काही लोक मात्र याला त्या काळातील परंपरा मानतात आणि आजही याचं पालन करतात. दरवर्षी होळीच्या उत्सवाच्या वेळी मोठ्या संख्येनं तरुण या मंदिरात येतात,” असंही गोपीनाथ म्हणाले.

- Advertisement -

पहिल्या रात्रीपूर्वी पूजा करतात नवविवाहित दाम्पत्य
गोपीनाथ म्हणाले की, या मूर्तींमध्ये प्रेमाशी संबंधित मूर्तींचाही समावेश आहे. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज चे प्रवक्ते वाविलपल्ली जगन्नाथ नायडू म्हणाले की, “त्यावेळी सेक्सबाबत फार जागरुकता नव्हती. सार्वजनिकरित्या यावर चर्चा केली जात नव्हती.
गोपीनाथ म्हणाले की, मंदिराच्या आसपासच्या गावांतील नवविवाहित जोडपी आधी या मंदिरामध्ये येतात. “मंदिराच्या आजूबाजुला जवळपास 50 गावांमधील नवविवाहित जोडपी लग्नानंतर पूजा करण्यासाठी सर्वांत आधी या मंदिरात येतात. ते मंदिराच्या चारही बाजूंचं तीन वेळा दर्शन घेतात. मंदिराच्या आसपास कामूक मूर्तीही आढळतात.” गोपीनाथ म्हणाले की, जोडप्यांनी ते पाहिल्यानंतरच त्यांच्या पहिल्या रात्रीची तयारी केली जाते. “मंदिर बांधलं त्यावेळी सुरू केलेली ही परंपरा आजही कायम आहे. मुलं असलेली दाम्पत्येही मंदिरात येतात आणि दर्शन घेतात.”

मूर्तींसाठी प्रसिद्ध आहे मंदिर
गोपीनाथ म्हणाले की, एकेकाळी या मंदिराला आंध्र खजुराहो असं म्हटलं जात होतं. याठिकाणी काही डोंगर किंवा शिळा आहेत ज्यातून कृष्णाच्या जीवनातील अनेक क्षणांचं दर्शन होत असतं. मेलियापुट्टी राधा वेणूगोपाल स्वामी मंदिराचं नाव घेताच मूर्तीकलेचं सौंदर्य डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळं त्याला आंध्रचे खजुराहो म्हटलं जातं. दुसरे एक पुजारी सत्यनारायण यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. “मंदिराच्या छतावर 64 दगडी फुलं आहेत. ते सर्व एकसारखेच दिसतात. पण बारकाईनं पाहिल्यास प्रत्येक फूल पूर्णपणे वेगळं असल्याचं लक्षात येतं. ते 64 कलांचे प्रतीक आहेत. या भागातील दुसऱ्या कोणत्याही मंदिरात अशा प्रकारची वास्तुकला पाहायला मिळत नाही,” असंही ते म्हणाले.

- Advertisment -

Manini