मुलांचे भावी आयुष्य सुखी आणि समाधानी व्हावे यासाठी सगळेच पालक मुलांना उत्तम शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असतात. पण यशस्वी होण्यासाठी फक्त शिक्षण पुरेसे नसून त्याबरोबर इतर ५ गोष्टींचेही ज्ञान मुलांना असणे आवश्यक असते.
- पैशांचे महत्व
पालकांकडे कितीही पैसे असले तरी मुलांना त्याचे महत्व नसते. कारण आपल्याकडे भरपूर पैसे आहेत हे पालक जेव्हा मुलांना दाखवत असतात त्यावेळी मुलांना पैसा कमावण्याची इ्च्छा राहत नाही. सगळेच पैशाने सहज मिळत असल्याने मुलं वायफळ पैसा उडवतात. त्यामुळे पैसा कमावण्यासाठी किती कष्ट करावे लागतात याबद्दल मुलांशी पालकांनी बोलावे.
- माफी मागणे
मुलांना वाढवताना शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने हातून चूक झाल्यावर समोरच्या व्यक्तीची माफी मागणे किती गरजेचे आहे हे सगळ्यात आधी मुलांना शिकवावे. कारण अनेक पालक प्रेमापोटी मुलांच्या लहान सहान चुकांकडे दुर्लक्ष करतात. . त्यामुळे आपण कुठे चुकलोय किंवा चुकतोय हेच मुलांना कळत नाही. आपण गुड बॉय, गुड गर्ल, परफेक्ट असल्याचा गैरसमज त्यांच्यात निर्माण होतो. हाच ग्रह मनाशी पक्का करून ही मुलं जेव्हा बाहेरच्या जगात जातात. तेव्हा काय चूक काय बरोबर हेच त्यांना कळत नाही. यामुळे चुकल्यावर माफी का मागायची याच अहंभावात ही मुलं वावरतात. त्यामुळे त्यांच्यात हेकेखोरपणा वाढतो. आपलं तेच खरं करण्याची वृत्ती वाढीस लागते.
- कौतुक करणे
दुसऱ्या मुलाने चांगले काम केल्यावर त्याच कौतुक करण्याबद्दल मुलांना शिकवावे. त्यामुळे त्यांच्यात दुसऱ्याप्रती मत्सर निर्माण होणार नाही. आपल्यापेक्षाही हुशार मुलं किंवा व्यक्ती जगात आहेत याचा तो स्विकार करेल.
- दुसऱ्यांचा सन्मान
बऱ्याचवेळा हे पाहावयास मिळतं की मुलं घरातील मोठ्यांचा आदर सन्मान करतात. पण बाहेरील मोठ्यांचा आदर करत नाहीत. त्यामुळे पालकांनी मुलांना मोठ्यांचा आदर करणे शिकवावे.
- वेळेचे महत्व
जीवनात यशस्वी होण्यासाठी वेळेच महत्व समजणं फार महत्वाच असते. त्यामुळे मुलांना वेळेचे महत्व समजवून सांगावे. त्यामुळे मुलं त्यांचा वेळ निरुपयोगी कामात घालवणार नाहीत. वेळेवर उठणे, वेळेवर झोपणे आणि वेळेवर काम करण्याचे महत्व त्यांना कळेल. ज्याचा फायदा त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी होईल.
हेही वाचा :