विराट कोहलीचा भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या सुरुवातीला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत संपल्यास, कोणत्या संघाला विजेता ठरवण्यात येणार? असा दोन्ही संघांना प्रश्न पडला होता. अखेर दोन्ही संघांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) शुक्रवारी अंतिम सामन्याच्या नियमांची घोषणा केली. आयसीसीने जाहीर केलेल्या ‘प्लेइंग कंडिशन्स’नुसार, अंतिम सामना अनिर्णित राहिला किंवा बरोबरीत संपल्यास दोन्ही संघांना संयुक्तरित्या विजेते घोषित करण्यात येणार आहे.
२३ जून हा राखीव दिवस
तसेच आयसीसीने अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवला आहे. ‘२०१८ मध्ये आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात होण्याआधीच हे दोन्ही निर्णय घेण्यात आले होते,’ असे आयसीसीने त्यांच्या पत्रकात म्हटले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना १८ ते २२ जून या कालावधीत साऊथहॅम्पटन येथे होणार असून २३ जून हा राखीव दिवस असणार आहे.
अंतिम सामन्यात ड्युक्स चेंडू
सामन्यादरम्यान वेळ वाया जात असल्यास आयसीसीचे सामनाधिकारी दोन्ही संघ आणि मीडियाला याबाबत माहिती देणार असून राखीव दिवस कशाप्रकारे वापरला जाईल हेदेखील सांगणार आहेत. तसेच राखीव दिवशी सामना खेळवला जाणार असल्यास पाचव्या दिवसाचा अखेरचा एक तास सुरु होण्याआधी याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले आहे. भारतीय संघ घरच्या मैदानावर एसजी चेंडूने, तर न्यूझीलंडचा संघ कुकबुराच्या चेंडूने खेळतो. परंतु, अंतिम सामन्यात ड्युक्स चेंडू वापरला जाणार आहे.