बीजिंग : चीनच्या भारताविरुद्ध कुरापती सुरूच आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलएसी) दोन-तीन वेळा भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा चिनी सैनिकांचा प्रयत्न भारतीय जवानांनी हाणून पाडला होता. आता पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशच्या काही ठिकाणांवर आपला दावा सांगण्यासाठी त्यांची नावे चिनी, तिबेटी आणि पिनयिन लिपीत प्रसिद्ध केली आहेत.
चीनच्या नागरी व्यवहार मंत्रालयाने रविवारी अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांची नावे जाहीर केली. यामध्ये दोन भूभागांची नावे, दोन निवासी क्षेत्रांची नावे, पाच पर्वतीय प्रदेशांची नावे आणि दोन नद्यांची नावे समाविष्ट आहेत. चीन सरकारच्या प्रांतीय परिषदेने या परिसराला जंगनन असे नाव ठेवून तो तिबेटच्या दक्षिणेकडील भाग असल्याचे म्हटले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने ही माहिती दिली आहे.
Flash: Chinese authorities announce new names of 11 locations in the Indian state of Arunachal Pradesh. Announcement made by Chinese civil aviation ministry. Notification: pic.twitter.com/p8EwoCj4Of
— Sidhant Sibal (@sidhant) April 3, 2023
चीन सरकारने अरुणाचल प्रदेशातील भूभागांना नवीन नावे जारी करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी 2017मध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातील सहा ठिकाणांच्या नावे आणि 2021मध्ये 15 ठिकाणांची नावे जाहीर केली होती. भारताने तीव्र आक्षेप घेत नावांच्या या दोन्ही याद्या फेटाळून लावल्या. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न आणि अविभाज्य भाग असल्यावर भारताने कायमत भर दिला आहे. तरीही यावर चीनने दावा करणे, यातून त्यांचा कुहेतू स्पष्ट होतो.
अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे स्वत:च ठरविण्याचा प्रकार चीनने पहिल्यांदाच केलेला नाही. यापूर्वीही त्याने असे प्रकार केले आहेत आणि भारत त्याचा तीव्र निषेध करतो, असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले.
तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांच्या भेटीनंतर 2017मध्ये चीनने पहिल्यांदा अरुणाचल प्रदेशच्या नावांचा सेट जारी केला. दलाई लामा यांनी अरुणाचल प्रदेशला दिलेल्या भेटीची ही प्रतिक्रिया असल्याचे हे मानले जाते. दलाई लामा यांचा तिबेटवरील चीनच्या ताब्याला विरोध आहे. त्यामुळे त्यांच्या मनात नाराजी आहे.