शेतकरी आणि इतर संघटनांच्या आंदोलनामुळे यंदा रेल्वेचे ३६.८७ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी बुधवारी दिली. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात, रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, आंदोलनामुळे उत्तर रेल्वेला या कालावधीत सर्वाधिक २२.५८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
वैष्णव म्हणाले की, पोलीस आणि कायदा सुव्यवस्था हे राज्याचे विषय असून रेल्वेवरील कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्ह्यांचे प्रतिबंध, नोंदणी व तपास करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. या प्रयत्नांमध्ये रेल्वे संरक्षण दल (RPF) मदत करते.
पुढील महिन्याच्या अखेरीस शेतकरी आंदोलन संपेल – टिकैत
तीनही कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयकही संसदेत मंजूर करण्यात आले आहे. वर्षभरापासून सुरू असलेल्या आंदोलनात आता आंदोलन संपवण्याबाबत शेतकऱ्यांमधून वेगवेगळी मते समोर येऊ लागली आहेत. दरम्यान, पुढील महिनाअखेरीस शेतकऱ्यांचे आंदोलन संपेल, असा दावा शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला आहे.
मोदींनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत आश्वासन दिले
राकेश टिकैत म्हणाले, ‘पंतप्रधानांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबाबत आश्वासन दिल्याने पुढील महिन्याच्या अखेरीस हे आंदोलन संपेल. १ जानेवारीपर्यंत एमएसपीवर कायदा केला नाही, तर हा मुद्दाही शेतकरी आंदोलनातील मागणीचा भाग बनेल. मात्र, सरकार हे अजिबात होऊ देणार नाही. त्यामुळे पुढील महिन्यापर्यंत हे आंदोलन संपणार आहे.
त्याचवेळी शेतकऱ्यांचा एक वर्ग आंदोलन संपवण्यासाठी पुढाकार घेत आहे, तर काही नेत्यांना आपल्या इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरूच ठेवायचे आहे.