बॉलीवूडच्या काही बहुचर्चित कपल्सपैकी एक म्हणजे ‘अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन’ ही जोडी. लवकरच ही जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाली आहे. ऐश्वर्या आणि अभिषेक लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. ‘गुलाब जामून‘ असं त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव असून या निमित्ताने अॅश आणि अभिषेक तब्बल ८ वर्षांनी एकत्र काम करणार आहेत. लग्नाआधी या दोघांनी ‘गुरु’ सिनेमात एकत्र काम केले होते. मध्यंतरीच्या काळात ऐश्वर्या आणि अभिषेकने एकमेकांसोबत काम करण्यासाठी नकार दिल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आता हे दोघं एका सिनेमात काम करणार असल्याचं नक्की झालं आहे. या बातमीमुळे अॅश-अभिषेकचे चाहते खुश झाले असणार यात काहीच शंका नाही. जाणून घेऊया, नेमका काय आहे हा चित्रपट
‘गुलाब जामून’ची गोडी
अनुराग कश्यपची निर्मीती असलेल्या ‘गुलाब जामून’ सिनेमात, अभिषेक आणि ऐश्वर्याची लव्हस्टोरी पाहायला मिळणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. सर्वेश मेवाडा हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार असून दोन वर्षांपूर्वीच सिनेमाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र, दोन वर्षांपूर्वी काही कारणांमुळे ऐश्वर्या आणि अभिषेकने एकमेकांसोबत काम करायला नकार दिल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान आता याबाबातची तिढा सुटली असल्यामुळे लवकरच हे दोघं सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात करतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. गुलाब जामून चित्रपटाच्या निमित्ताने या ‘रिअल लाईफ’ कपलला ‘रिल लाईफ’मध्ये पुन्हा एकदा रोमान्स करताना पाहायची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. सध्या अभिषेक बच्चन ‘मनमर्जिया’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे तर ऐश्वर्या राय ‘फन्ने खान’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.