पुलवामा येथे घडलेल्या घटनेवर माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपले मत दिले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. तर, राहुल गांधी यांची पाठ थोपटली आहे. ‘हल्ला झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी विरोधी पक्षांसह सरकारला पुर्ण पाठिंबा दर्शवला. अशाप्रसंगी शत्रूंचा फूट पाडण्याचा हेतू असतो. परंतु, राहूल यांनी शत्रूंचा हा प्रयत्न विफल करुन संपूर्ण देश एक आहे, हे दाखवून दिले. यातून राहूल गांधींची परिपक्वता दिसते. याउलट नरेंद्र मोदी २०१४ मध्ये घडलेल्या घटनांवर काय बोलत होते? हे आठवून पाहा. जणूकाही सर्व काँग्रेसमुळेच झाले आहे आणि तेव्हाचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानला मोकळे सोडले होते, असे चित्र ते उभे करत होते. वस्तुत: तेव्हा परिस्थिती जास्त नियंत्रणाखाली होती, आज जास्त चिंताजनक आहे’, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. मालेगावच्या झाडी येथे भुजबळ प्रकल्पाच्या पाहणीसाठी गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली.
‘जवानांचे कुटुंब, जनता टाहो फोडत आहेत आणि मोदी सभा घेताहेत’
‘पुलवामा येथील दहशतवादी हल्ला हा अत्यंत दुर्देवी आणि खेदजनक आहे’, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत. दरम्यान, हा हल्ला झाल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहेत. विविध ठिकाणी सभा घेत आहेत. कालच त्यांची धुळ्यात सभा झाली. त्यांच्या याच सभांच्या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी मोदींवर टीका केली आहे. शनिवारी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे पार्थिव त्यांच्या गावात पाठविण्यात आले होते आणि त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यावर संपूर्ण देश हळहळ व्यक्त करत आहे. तर दुसरीकडे नरेंद्र मोदी देशातील विविध ठिकाणी सभा घेत आहेत. याच सभांच्या पार्श्वभूमीवर छगन भूजबळ यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ‘जवानांचे कुटुंब, जनता टाहो फोडत असताना मोदी सभा घेत आहेत, ही बाब अत्यंत खेदजनक आहे’, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
‘पुलवामा हल्ल्याची घटना अत्ंयत निषेधार्ह’
पुलवामा येथील दहशतवादी हल्ला हा अत्यंत निषेधार्ह आहे, असे भुजबळ म्हणाले आहेत. या हल्ल्यात ४४ जवान मारले गेले आहेत. त्यामुळे घटनेचे गांभीर्य आणि तीव्रता आणखी वाढली. ७० वाहनांच्या ताफ्यातून या जवानांना नेले जात होते. एकावेळी एव्हढा ताफा नेणे, सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नव्हते. हल्ल्याबाबत सुचना होती. रस्ता सॅनीटाईज करायला हवा होता. हल्ला होईल ही शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे गुप्तवार्ता मिळवण्यात अपयश आलं, हे नक्कीच आहे. ही दुर्दैवाची घटना टाळणं शक्य होतं का? हे भविष्यात कळेल, असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.