आपल्या राज्याला वारकऱ्यांची जुनी परांपरा आहे. मान्सून दाखल होण्याच्या काळातच राज्यात विविध ठिकाणांहूनही पंढरपूरासाठी पालख्या निघतात. येत्या २३ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. त्याकरता शेगांवच्या गजानन महाराजांची पालखी गेल्या आठवड्यातच पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. त्या पाठोपाठ संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज, संत एकनाथ महाराज यांच्याही पालख्या पंढरपूरला निघणार आहेत. ऐन पावसाळ्यात वारीला सुरूवात होत असल्याने राज्यात नुकतीच लागू करण्यात आलेल्या प्लास्टिक बंदीचा फटका वारकऱ्यांना बसू शकतो. पायी चालत जाताना पावसात भिजू नये याकरता वारकरी प्लास्टिक कवच घेतात, त्यावर कारवाई केली जाऊ शकते. अशातच डबेवाले संघटनांनी वारकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्थेची मागणी सरकारकडे केली आहे.
‘होईल भिकारी, पंढरीचा वारकरी’
प्लास्टिकवर बंदी घालण्याचा सरकारचा निर्णय हा योग्यच आहे. मात्र सर्व पालख्या या पावसाळ्यातच निघतात. वारीला जाणारे लाखो गरीब वारकरी आहेत. आषाढी एकादशीला ते पंढरपूरात पोहोचतात. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी गरीब वारकरी २० रुपयांचं प्लास्टिक कवच डोक्यावर घेतो. अवघ्या २० रुपयांचं प्लास्टिक कवच हा वारकरी संपूर्ण महिनाभर वापरतो. प्लास्टिक बाळगल्यामुळे जर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली तर ‘होईल भिकारी पंढरीचा वारकरी,’ अशी परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती डबोवाले संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार
वारकऱ्याकडे प्लास्टिक आढळल्यात नियमानुसार त्याच्यावर दंडात्मक कारवाई होईल. त्याचा ५ हजार रुपयांचा दंड माझा गरीब वारकरी भरू शकणार नाही. त्यामुळे सरकारनेच त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी सुभाष तळेकर यांनी केली आहे. सरकारने वारकऱ्यांसाठी रेनकोट उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी सुचवले आहे. शिवाय येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून वारकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निवेदन करणार असल्याचेही तळेकर यांनी म्हटले आहे.
डबेवालेही जाणार वारीला
दरवर्षीप्रमाणे यंदाही डबेवाले वारीत सहभागी होणार आहेत. पहिल्या १५ दिवसात व्यवसाय सोडून ते वारीला जाऊ शकत नाहीत. एकादशीच्या आदल्या दिवशी डबेवाले संघटनेकडून १० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. एक दिवस सुट्टी घेऊन काही डबेवाले सहकुटुंब वारीला जातील. एका बसधून ५० सदस्य यानुसार १० बसेस मधून साधारण ५०० डबेवाले यंदा सहकुटुंब वारीला जाणार आहेत.