राज्यात एकीकडे करोनाचे संकट असताना महाविकास आघाडी सरकारमध्येही नाराजी असल्याचे समोर येत आहे. महाविकास आघाडीत मतभेद निर्माण करण्यासाठी नोकरशहांवर मंत्री अशोक चव्हाण यांनी आरोप केला आहे. त्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा मुद्दा समोर आणणार आहे, असे त्यांनी सांगितले. एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत देताना अशोक चव्हाण म्हणाले की, अधिकार्यांमुळे सरकारमध्ये मतभेद होत आहेत.
याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पुढील २-३ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही सरकारमध्ये काही मुद्द्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे, असे सांगत महाविकास आघाडी सरकारच्या निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला सहभागी करुन घ्यावे, अशी आग्रही मागणी केली होती.
तसेच भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी काँग्रेसने सरकारला साथ दिली आहे, याचा अर्थ काँग्रेस कमकुवत आहे, असे नाही. ठाकरे सरकारमध्ये काँग्रेस मंत्र्यांचे ऐकले जात नाही. तिन्ही पक्षाचे मिळून हे सरकार बनले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निश्चित काँग्रेसचे जे म्हणणे आणि मुद्दे असतील ते ऐकून त्यावर तोडगा काढतील अशी अपेक्षा मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.