बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याप्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रश्मी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी मुंबई उच्च न्यायलयात त्यांच्या याचिकेवर सुनावणी पार पडली. यादरम्यान न्यायालयाने रश्मी शुक्ला यांना दिलासा दिला आहे. 25 मार्चपर्यंत त्यांच्याविरोधात अटकेची कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
Maharashtra | Bombay High Court grants relief from arrest to former Pune CP Rashmi Shukla till 25th March. She has filed a plea before the Court seeking cancellation of FIR registered against her. A case of phone tapping is registered against her at Bund Garden PS in Pune.
— ANI (@ANI) March 4, 2022
पुण्याच्या पोलीस आयुक्त पदावर असताना म्हणजेच 2015 ते 2019 या काळात राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅप केल्याचे आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्याविरोधात पुण्यातील बंडगार्डन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र या प्रकरणात आपल्याला अडकवण्यात आल्याचे म्हणत राजकीय सुडबुद्धीने हा गुन्हा दाखल केल्याचा दावा रश्मी शुक्ला यांनी केलाय. यानंतर त्यांनी गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने त्यांनी दिलासा देत 25 मार्चपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश पोलिसांना दिलेय. शुक्ला या मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्त होत्या. सध्या त्या हैदराबादमध्ये सीआरपीएफच्या अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.
नेमकं प्रकरण काय आहे?
मार्च 2016 ते जुलै 2018 दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्त पदावर असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख, संजय काकडे यांचेही या काळात फोन टॅप करण्यात आले होते असे म्हटले गेले.
यावेळी मंत्री नाना पटोले यांनी अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या अमजद खानच्या नावं सांगून आपला फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर केला होता. तसेच केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे स्वीय सहाय्यक, तत्कालीन भाजप खासदार संजय काकडे आणि इतर निवडून आलेल्या अन्य काही लोकप्रतिनिधींचेही फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप नाना पटोलेंनी केला. या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकचं खळबळ उडाली. याप्रकरणी नंतर रश्मी शुक्लांविरोधात पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र हा गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
या याचिकेत रश्मी शुक्ला यांनी आपल्या विरोधातील गुन्हा निव्वळ राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आल्याचे म्हणत या प्रकरणात त्यांनी गोवण्यात आल्याचा दावा केला.
या फोन टॅपिंग प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातही टीका केली. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेची यात चौकशी करावी अशी मागणी पटोले यांनी केली होती.