पुण्यात गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीवेळी महिला पोलीस कॉन्स्टेबल निलिमा गायकवाड यांनी अनेकांना पाण्याबाहेर काढून त्यांचे प्राण वाचत आपले कर्तव्य बजावले. या झाशीच्या राणीचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशस्तिपत्र देऊन त्यांना सन्मानित केले आहे. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक आदि उपस्थित होते.
नेमके काय घडले?
गेल्या आठवड्यात म्हणजेच गुरुवारी मुठा उजवा कालवा फुटल्याने दांडेकर पूल परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती. परिरात हाहाकार माजला होता. अनेक नागरिक आणि लहान मुले घरांमध्ये अडकली होती. त्यावेळी महिला कॉन्स्टेबल नीलीमा गायकवाड या कर्तव्य बजावत असताना स्वतः पाण्यात उतरुन एका लहान मुलाला आपल्या पाठीवर घेऊन नीलिमा यांनी अत्यंत्य धाडसाने आपले कर्तव्य पार पाडले. आपत्कालिन परिस्थितीत त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय कार्याची सर्वांनी कौतुक देखील केले. याचीच दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
नीलिमा यांना जनता वसाहतीची परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिले गेले होते. त्यानंतर नीलिमा या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि दीड तास त्यांनी पाण्यात अडकलेल्या महिला आणि लहान मुलांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचे काम केले होते. नीलिमा यांनी झाशीच्या राणी सारखे मुलाला पाठीवर घेतले आणि दोरीच्या साहाय्याने पाण्यातून वाट काढत होत्या. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होतो त्यावेळी अनेकांनी त्यांचे कौतुक देखील केले. नीलिमा यांनी १५ नागरिकांना सुरक्षित स्थळी नेले. त्यामुळे त्या नक्कीच कौतुकास पात्र असल्याने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.