पश्चिमेतील पालिकेच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र सभापती वृषाली जोशी यांच्या केबीनमध्ये पावसाच्या पाण्याची गळती होत असल्याने बसायचे कुठे? असा प्रश्न पडला होता. मात्र सभापती जोशी यांनी थेट दालनातच छत्री उघडून खुर्चीत ठाण मांडले आणि पालिका प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध केला.
सकाळपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने ‘ह’ प्रभाग समितीच्या सभापती जोशी यांच्या दालनात पावसाच्या पाण्याची गळती होत असून, भिंतीमधून, खिडक्यांमधून पाणी टिपकत आहे. त्यामुळे दालनातील कार्पेट पूर्ण ओले झाले असून कागदपत्रही भिजली आहेत. सततच्या पाणी झिरपण्यामुळे दालनात ओलावा असून सगळीकडे बुरशी पकडली आहे.
अशा गैरसोयीच्या ठिकाणी बसून नागरिकांचे प्रश्न कसे सोडवायचे? याबाबत जोशी यांनी नाराजी व्यक्त केली. केबीनच्या डागडुज्जीकडे पालिका प्रशासनाने कानाडोळा केल्यानेच ही परिस्थिती ओढवली आहे. ही स्थिती आजची नसली तरी वर्षानूवर्षे त्याकडे कानाडोळा का केला गेला? असा सवाल माजी नगरसेवक रणजीत जोशी यांनी केला आहे. इमारतीची वेळच्या वेळी डागडुजी आणि पाणी झिरपू नये यासाठी काही उपाययोजना का केल्या नाहीत?, असे ते म्हणाले.
नागरिक आपल्या समस्या घेऊन सभापतींना भेटण्यासाठी येतात. तसेच नागरिक आपले गा-हाणे मांडण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात येतात. त्यामुळे त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीच थेट छत्री उघडून कारभार केल्याचे जोशी यांनी सांगितले.