अपंग ऐवजी ‘दिव्यांग’ हा शब्द वापरण्याच्या केंद्राच्या कल्पनेनंतर आता राज्य सरकारनं विधवा महिलांच्या नावापुढं गं. भा. (गंगा भागिरथी) असा उल्लेख करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यावरून राज्यातील महिला संघटना व कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. यावरून आता वादाला सुरूवात झाली आहे. या वादात आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उडी घेतली असून गं. भा. या शब्दाऐवजी नवा शब्द सांगितला आहे.
विधवांना गंगा भागिरथी म्हणावे यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. तसा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश लोढा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मात्र, मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी विधवांचा सन्मान करण्यासाठी नवा शब्द सुचवल्याने अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या लोढा यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी सुद्धा यावर टीका केलीय.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत ही टीका केलीय. ‘ गं. भा. म्हणजे गंगा भागिरथी…नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती. याऐवजी कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी सौभाग्यवती श्रीमती … असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे’, असं त्यांनी या ट्वीटमध्ये लिहिलंय.
गं.भा. म्हणजे गंगा भागीरथी…नवरा गेल्यानंतर गंगेवर जाऊन केशवपन केलेल्या स्त्रीला गं.भा. म्हणायची, लिहायची पद्धत होती.
याऐवजी
कोणत्याही सज्ञान स्त्रीला कुमारी सौभाग्यवती श्रीमती … असे वेगवेगळे उल्लेख करण्यापेक्षा नुसतं “श्रीमती” म्हणायला काय हरकत आहे@MPLodha pic.twitter.com/Z1fH4kaSXs
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 13, 2023
हे ही वाचा: आजच्या भीम जयंतीदिनी मोबाइलवरून पाहता येणार डॉ.बाबासाहेबांच्या नावाचा तारा
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी देखील टीका केली आहे. “राज्याचे महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधवा महिलांना गंगा,भागिरथी हे शब्द वापरावेत अशा पद्धतीचा प्रस्ताव पाठवलेला आहे. खरंतर विधवा महिलांचा प्रश्न ज्वलंत आहे. त्यांच्या वाट्याला आधीच भरपूर दुःख आलेलं असतं आणि त्यातच अशा पद्धतीने नद्यांची नावे पाठवणे म्हणजे विधवा महिलांची थट्टा केल्यासारखे आहे.यामुळे त्यांना समाजात ट्रोलसुद्धा केले जाऊ शकते” असं तृप्ती देसाई म्हणाल्या.