पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असला तरी उन्हाळ्यात ठाणे जिल्ह्यातील बहुतेक गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावते. गावपाड्यांलगत असणारे नैसर्गिक ओढ्या नाल्यांचे पाणी अडविणे हाच त्यावरचा उपाय आहे. अनेक स्वयंसेवी संस्था ग्रामीण भागात जल संधारणाचे असे उपक्रम राबवीत आहेत. गेल्या उन्हाळ्यात शहापूर तालुक्यातील अष्टे गावात जलकल्याण समिती आणि वसुंधरा संजीवनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने काँक्रिटचा बंंधारा बांधण्यात आला. सध्या या बंधार्यातून दुथडी भरून पाणी वाहत आहे. गुरुवारी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्यांनी अष्टे गावाला भेट देऊन बंधार्याच्या ठिकाणी जलपूजन केले. त्यामुळे गावकर्यांना दुबार पेरणी करता येणार आहे.
या गावातील बहुतेक ग्रामस्थ पावसाळी शेती करतात. मात्र पाण्याअभावी त्यांना दुबार पीक घेणे शक्य होत नाही. कारण गावाबाहेरून वाहणार्या नैसर्गिक ओढ्याचे पात्र दिवाळीनंतर कोरडे होते. गावकर्यांची ही अडचण लक्षात घेऊन दोन्ही संस्थांनी मे महिन्यात ओढ्यावर काँक्रिटचा बंधारा बांधला. या बंधार्यामुळे या ओढ्यात आता पावसाळ्यानंतर किमान एक कोटी १० लाख लिटर पाणीसाठा एप्रिल महिन्यापर्यंत टिकणार आहे. त्यामुळे गावातील शेतकर्यांना पावसाळ्यानंतर भाजीपाला अथवा कडधान्य लागवड करता येईल. त्यामुळे या संस्थांचे गावकर्यांनी आभार मानले.
जलपूजन सोहळ्यास जनकल्याण समितीचे गिरीश दीक्षित, प्रदीप पराडकर, प्रमोद क्षीरसागर, आनंद राऊळ, विजय इनामदार, वसुंधरा संजीवनी मंडळाचे अशोक हिंगणे आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यानिमित्ताने दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्यांनी गावकर्यांशी संवाद साधला. जनकल्याण समितीने गावात संस्कार वर्ग सुरू करण्याची तयारी दर्शवली, तर वसुंधरा संजीवनी मंडळ गावातील शेतकर्यांना मार्गदर्शक ठरेल, असे एक कृषी विषयक पुस्तकांचे छोटे ग्रंथालय भेट देणार आहे.