ज्या वानखेडे स्टेडियमवर भारतीय संघाने दुसऱ्यांदा विश्वकप उंचावला होता ते वानखेडे स्टेडियम कसं बनलं याचा इतिहास प्रत्येकांनी जाणून घेणे गरजेचे आहे. आज (2 नोव्हेंबर) रोजी विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध श्रीलंका आमने-सामने येणार असून, काही तासानंतर हा सामना सुरू होणार आहे. याच सामन्याच्या निमित्ताने वानखेडे स्टेडियमचा घेतलेला हा आढावा.
देशातील क्रिकेट मुंबईतच सुरू झाले. बॉम्बे जिमखान्यात भारतीय क्रिकेटचा पहिला सामना पार पडला. यावेळी दर्जेदार स्टेडियम असावे म्हणून गवर्नर लॉर्ड ब्रेबॉर्न यांच्या नावाने 1937 साली सीसीआयने ब्रेबॉर्न स्टेडियमची उभारणी केली होती.
1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि सरकारही स्थापन झाले. या सरकारमध्ये विदर्भातून आलेले शेषराव वानखेडे मंत्रिमंडळात होते. अर्थमंत्री असलेले बॅरिस्टर शेषराव वानखेडे हे दर्दी क्रिकेटप्रेमी होते. त्यांनी 1963 साली बॉम्बे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षपदही भूषवले होते.
एका चॅरिटी मॅचसाठी शेषराव वानखेडे हे विजय मर्चंट यांना भेटण्यास गेले होते. घरी आलेल्या आमदारांचे मर्चंट यांनी आदरातिथ्य केले, पण त्यांनी मॅचसाठी मैदान देण्यास नकार दिला. यावेळी वानखेडे आणि मर्चंट यांच्यात वाद झाला. वानखेडे यांनी यावेळी आम्हाला नवीन स्टेडियम बांधावं लागेल असे म्हणताच मर्चंट म्हणाले, ‘तुम घाटी लोग क्या स्टेडीयम बनाओगे?
मर्चंट यांनी केलेला मराठी माणसाचा अपमानानंतर वानखेडे यांनी हा वाद मुख्यमंत्र्यांना सांगितला. पण स्टेडियम बांधायचा खर्च उचललायला मुख्यमंत्री तयारच नव्हते. त्यावेळी वानखेडे यांनी फक्त जागा द्या, पैसे आम्ही लावतो अशी ऑफर दिली.
1974 ला वानखेडे स्टेडियम सुरू झाले आणि सीसीआयची किंमत कमी झाली. 1973 नंतर ब्रेबॉर्नला पुढची कसोटी आयोजित करायला 36 वर्ष वाट पहावी लागली.