सिंधुदुर्ग: भारतीय नौदल दिनाच्यानिमित्ताने राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. यंदाचा नौदल दिन हा सिंधुदुर्गावर साजरा केला जात आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निष्ठेंची महती सांगितली तसंच पंतप्रधानांबाबत कौतुकोद्गार काढले आहेत. तसंच, कार्यक्रम शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करणाऱ्या नौदलाचं कौतुक केलं. (Navy Day 2023 Union Minister Narayan Rane said Importance of Loyalty at a program in Sindhudurga)
सिंधुदुर्ग किल्ला बांधणाऱ्या हिरोजी इंदुलकर यांचं नाव घेत खुद्द नारायण राणेंनी निष्ठेची महती समजावून सांगितली. राणे म्हणाले की, 1664 रोजी छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्याच्या जागी आले. त्यांना ही जागा सुरक्षित वाटली. त्यावेळी त्यांनी हिरोजी इंदुलकरांना हा किल्ला बांधायला सांगितला. तसंच, रायगड किल्लाही हिरोजी यांनी बांधला आहे. अतिशय चांगला किल्ला बांधल्याचं म्हणत महाराजांनी हिरोजींचं कौतुक केलं आणि त्यांना बक्षीस स्वरुपात काय हवं, असं विचारलं, मला जगदीश्वर मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या पायऱ्यांमधील शेवटच्या पायरीवर माझं नाव लिहिण्याची मला परवानगी द्या. मला तुमच्या पायाशी असू द्या. यावरून शिवाजी महाराजांच्या मावळ्यांची निष्ठा, प्रेम यांचा प्रत्यय येतो. हिरोजी इंदुलकरांकडून निष्ठा शिकावी, असं म्हणत राणेंनी निष्ठेची महती सांगितली.
पंतप्रधानांचा पायगुण
राणे म्हणाले की, चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागले त्यातील तीन राज्यांमध्ये भाजपाने विजय मिळवला आहे. सर्वांच्यावतीने त्यांचं अभिनंदन. पंतप्रधानांबाबत आम्हाला अभिमान आहे ते जिथे जातात तिथे यश घेऊन येतात हा असा त्यांचा पायगुण आहे. राज्यांमध्ये मिळालेला विजय हा मोदींनी 9 वर्षांच्या काळात केलेल्या कामांचा परिणाम आहे, असं म्हणत नारायण राणे यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात कौतुकोद्गार काढले आहेत.
(हेही वाचा: Narendra Modi : शिवरायांच्या दूरदृष्टीने नौदल शक्तिशाली; पंतप्रधान मोदींचं मोठे वक्तव्य )