चौक: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीसच खालापूर तालुक्याला पाणी टंचाईचे ग्रहण लागले असून पाच गावे आणि दोन वाड्या टंचाईग्रस्त झाल्या असून तहानेने व्याकूळ झालेल्या आहेत. सद्या उन्हाचे चटके बसत आहेत,त्यातच पाणी टंचाई परिस्थिती अत्यंत हालाखीची झाल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पाच गावे आणि दोन वाड्या यांना टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यास सुरूवात झाली आहे.
खालापूर तालुक्यातील वावोशी हे ११६१ लोकसंख्या, इसांबे हे ४३३, उजलोळी हे ३०३, चिलठण हे ५२५,उसरोली हे ४७२ तर खडई वाडी ही १४२ आणि हालखुर्द ही ३५१ लोकसंख्या असलेली टंचाई ग्रस्त गाव वाड्या आहेत. अजून एप्रिल, मे आाणि जूनचा पंधरवडा जाणार असून या कालावधीत किती गावे, वाड्या टंचाई ग्रस्त होणार आहेत? टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून काय उपाय योजना करण्यात येतील, हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. तथापी खडईवाडी ही खानाव ग्रामपंचायत हद्दीतील वाडी आहे, येथे ग्रामपंचायतीने टँकर सुरू केला असून जल जीवन योजनेतून विहीर प्रस्तावित आहे. येथील विहिरीला लावलेल्या पंपाची विद्युत पुरवठा वाहिनी देयक न भरल्याने वीज मंडळाने वीज पुरवठा खंडित केला होता, त्यामुळे येथे ग्रामपंचायतने सोलर पॅनल उभा केला आहे. मात्र जल स्तोत्र कमी झाल्याने पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. माणसांपेक्षा पाळीव जनावरांची संख्या जास्त असल्याने जनावरांचा पाणी पुरवठा महत्वाचा आहे,असे ग्रामसेवक अजय फोफेरकर यांनी सांगितले. वावोशी येथील मल्हारनगर आणि भीमनगर येथे पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. येथील पाईप लाईन दुरुस्ती करण्यात आली आहे. येथे पाणी कमी झाल्यास ग्रामपंचायत टँकरद्वारे पाणी पुरवठा करणार आहे तर ईसांबे येथेही टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरळीत सुरु आहे.
जलसाठा कमी झाल्याने टंचाई
चिलठण आणि उसरोली येथेही जलसाठा कमी झाला असून उपलब्ध असलेल्या बोरवेलचे पाणी कमी झाल्याने पाणी टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. उजलोली येथेही बोअरवेलचे पाणी कमी झाल्याने टँकर सुरू करण्यात आला आहे. चिलठण येथील पाझर तलावचे काम गेली काही वर्षे रखडले असल्याने येथे पिण्याच्या पाण्याबरोबर सिंचन देखिल होत नाही.या पाझर तलाव कामाबाबत स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जाते.