रोहित शर्माला पुढील दोन टी-२० विश्वचषकांसाठी भारताचा कर्णधार केले पाहिजे, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. गावस्कर यांनी असेही सांगितले की, लोकेश राहुल आणि रिषभ पंत यांना टी-२० फॉरमॅटमध्ये उपकर्णधार करायला हवे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने टी-२० विश्वचषक २०२१ नंतर टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली आहे.
मात्र, पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषकातच रोहित शर्माला कर्णधार करावे असे मत सुनील गावस्कर यांनी व्यक्त केले आहे. तेसच, पुढील वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी देखील रोहितनेच नेतृत्व करावे, असे देखील गावस्कर म्हणाले. उपकर्णधारपदासाठी त्यांनी केएल राहुल आणि रिषभ पंत यांची निवड केली आहे.
मला वाटते रोहित शर्मा पुढील दोन विश्वचषकांसाठी सज्ज आहे. त्यामुळे पुढील दोन टी-२० विश्व चषकासाठी रोहित कर्णधार असावा. दोन्ही वर्ल्ड कप स्पर्धांमधील कालावधी कमी असल्याने कर्णधार बदलू नये, असे गावस्कर म्हणाले. रोहित शर्मा हाच दोन्ही टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी माझी निवड असल्याचं सुनील गावस्कर म्हणाले.
गावस्कर यांनी केवळ टीम इंडियाचा कर्णधार कोण असावा सांगितले नाही तर उपकर्णधार कोण असावा हे देखील सांगितले आहे. केएल राहूल हा टीम इंडियाचा उपकर्णधार म्हणून पाहायला आवडेल. तसेच, रिषभ पंतने ज्या प्रकारे दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व केले आहे ते कौतुकास्पद आहे. त्याला उपकर्णधार म्हणून पाहायला आवडेल, असे सुनील गावस्कर म्हणाले.
आयपीएलमध्ये रिषभ पंतनं ज्या प्रकारे त्याच्या गोलंदाजाचा वापर केला त्यावरुन तो स्मार्ट कॅप्टन्सी दाखवतोय, असे गावस्कर म्हणाले. कोणत्याही टीमला एका चतूर कॅप्टनची गरज असते, जो कोणत्याही परिस्थिती चलाखीने निर्णय घेऊ शकेल, असे गावस्कर म्हणाले. राहुल आणि पंत हे दोन खेळाडू आहेत जे टीम इंडियाचे उपकर्णधार होऊ शकतात, असे गावस्कर म्हणाले.