कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघामधील कळवा भागात आमदार निधीतून उभारण्यात आलेली एलईडी स्क्रीन सोमवारी अचानक तोडून फोडून काढण्यात आल्या. असे ट्विट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. किती ते सुडाचे राजकारण असा उल्लेख करीत कोणाच्या सांगण्यावरुन हा बोर्ड तोडण्यात आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. परंतु रविवारी ‘गद्दार सेनेचे’ खासदार आणि ‘शकुनीमामा’च्या दौर्यानंतर हा बोर्ड काढण्यात आला. मात्र शहरभर अशा प्रकारचे विविध पक्षाच्या पदाधिकार्यांचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. त्यांच्यावर का कारवाई नाही, असा सवाल आता राष्ट्रवादीचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे. महापालिका आयुक्त बांगर यांनी याची उत्तरे द्यावीत. अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी दिला.
ठाण्यात सध्या बाळासाहेबांची शिवसेना विरुध्द राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात आरोप प्रत्यारोपांचे आणि फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. त्यात रविवारी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार सघांत येणार्या कळवा, आणि मुंब्य्रातील विविध विकास कामांचा शुंभारभ करण्यात आला. यावेळी या भागात लावण्यात आलेल्या बॅनरवरुन राजकारण तापले आहे. राष्ट्रवादीच्या काही माजी नगरसेवकांनी या संदर्भातील बॅनर लावून आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सोमवारी अचानक कळवा पूर्वेला आमदार निधीतून केलेल्या कामांचा उल्लेख असलेली एलईडी बोर्ड सकाळीच मोडतोड करुन काढण्यात आला. यावरुन आमदार आव्हाड यांनी ट्विट केले असून किती ही सुडाचे राजकारण असा त्यात उल्लेख करण्यात आला आहे. संपूर्ण ठाण्यात असेच एलईडी स्क्रीन लावण्यात आलेले आहेत. परंतु केवळ आव्हाड यांच्यावर एवढा राग का? असा सवाल उपस्थित करीत या कारवाईचा निषेध केला आहे. दुसरीकडे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना शहरात लावण्यात आलेले इतर एलईडी बोर्ड त्यांना दिसले नाहीत का? असा सवाल उपस्थित केला आहे.