राज्य सहकारी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावर राज्यभरात शरद पवार यांच्याकडून लोकांची सहानुभूती मिळविण्यासाठी ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट केला गेला आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला. ’राज्य सहकारी शिखर बँक घोटाळाप्रकरणी २०१० मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराची चौकशी सुरू करण्यात आली.
यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाच्या आदेशानुसार शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. १०० कोटींच्या पुढे गैरव्यवहार असेल, तर ईडीला स्यु मोटो घेऊन संबधीत आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे अधिकार आहेत. त्यानुसार शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु, या माध्यमातून नागरिकांची सहानुभूती मिळविण्यासाठी शरद पवार यांनी याचा राजकीय इव्हेंट केला आहे. तसेच, यापूर्वी छगन भुजबळ यांना अटक झाली, त्यावेळी कोणी का समोर आले नाही? असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.