मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर जे आरोप केले आहे, या आरोपाबाबत आज दिल्लीत बैठक होणार आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक होणार आहे. आज, रविवारी सायंकाळी ५ ते ७ या दरम्यान ही बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सहभागी असणार आहेत. या बैठकीत लेटरबॉम्ब प्रकरणी चर्चा होणार असून गृहमंत्र्यांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
गृहमंत्र्यांची शरद पवारांशी झाली चर्चा
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यामध्ये चर्चा झाल्याचे समोर आले आहे. शरद पवार यांचे देशमुखांसोबत फोनद्वारे बोलणे झाले आहे. तसेच या दरम्यान, अनिल देशमुख यांनी शरद पवार यांना सर्व माहिती दिली असल्याचे देखील समोर येत आहे. दरम्यान, परमबीर सिंह यांच्या कथित पत्रानंतर ही बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे आता या बैठकीत गृहमंत्र्यांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.
गृहमंत्री बदलण्याबाबत मोठा निर्णय?
या बैठकीत गृहमंत्री बदलण्याचा मोठा निर्णय घेण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजच्या बैठकीत लेटरबॉम्ब प्रकरणी चर्चा होण्याची शक्यता दिसून येत आहे. त्यामुळे आता या बैठकीत नेमके काय होणार हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा – सरकारवर नक्कीच शिंतोडे उडाले आहेत – संजय राऊत