अॅलोपॅथी हा तमाशा आहे. अॅलोपॅथी म्हणजे स्टुपिड आणि दिवालिया सायन्स असल्याचे धक्कादायक वक्तव्य करत योग गुरू बाबा रामदेव यांनी देशभरातील डॉक्टरांना अंगावर घेतले आहे. जितके मृत्यू बेड्स न मिळाल्याने किंवा ऑक्सिजनअभावी हॉस्पिटलमध्ये झाले नाहीत, त्यापेक्षा लाखो मृत्यू हे अॅलोपॅथीने झाले, असे वादग्रस्त वक्तव्य सोशल मीडियावर व्हिडिओतून व्हायरल झाले असून, याचा डॉक्टरांनी निषेध नोंदवला असून रामदेवबाबांवर कारवाई करण्याची जोरदार मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या वतीने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडेही याबाबतची तक्रार केली आहे. रामदेव यांनी १२०० डॉक्टरांच्या बलिदानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असल्याचा दावा असोसिएशनने केला आहे.
कोरोनाच्या आव्हानाच्या काळामध्ये डॉक्टरांचे खच्चीकरण करणारे हे वक्तव्य आहे. संपूर्ण कोरोनाविरोधी लढ्यामध्ये मेडिकल डॉक्टरांनी फ्रंटलाईन योद्ध्यासारखी कामगिरी केली आहे. तसेच संपूर्ण लढाईत संपूर्ण यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून या डॉक्टरांनी रुग्णांची सेवा केली आहे. स्वयंघोषित बिझनेसमेन बाबा रामदेव हे डॉक्टरांच्या विरोधी द्वेष पसरवत आहेत. तसेच डॉक्टर आणि रुग्णांमधील नातेही बिघडवत असल्याचा दावा मेडिकल असोसिएशनने केला आहे.
रेमडेसिवीर, अॅन्टीबायोटिक, प्लाझ्मा थेरपीवर बॅन आले, फॅव्ही फ्लू ही सगळी औषधे अपयशी ठरत आहेत. तापाचे कोणतेही औषध उपयुक्त ठरत नाही. त्या व्हायरस, बॅक्टेरियाला, फंगसला ज्या कारणाने संसर्ग होत आहे त्यावर औषध देण्यात येत नाही. लाखो लोकांचा मृत्यू हा अॅलोपॅथीचे औषध खाल्ल्याने झाला आहे. जितके मृत्यू ऑक्सिजन आणि हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळल्याने झाले नाहीत, त्यापेक्षा अधिक मृत्यू हे अॅलोपॅथीचे औषध खाऊन झाले असल्याचे अतिशय धाडसी वक्तव्य बाबा रामदेव यांनी केले. मी खूपच मोठे वक्तव्य करत आहे. या वक्तव्यानंतर या मुद्यावर वाद निर्माण होऊ शकतो, असेही बाबा रामदेव म्हणाले. स्टेरॉईड्समुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
लाखो लोकांच्या मृत्यूचे कारण अॅलोपॅथी आहे. अॅलोपॅथी संपूर्णपणे फेल आहे, असे मी म्हणत नाही. त्यावेळी मॉडर्न मेडिकल सायन्स आणि तंत्रज्ञानाला माझा विरोध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण वेगवेगळे प्रयोग आणि त्याचा निष्कर्षावर त्यांनी बोट ठेवले. इंडियन मेडिकल असोसिएशनमार्फत योग गुरू रामदेव यांनी सोशल मीडियावर अॅलोपॅथीवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आक्षेप घेण्यात आला आहे. असोसिएशनमार्फत केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्याकडे कारवाईची मागणी करत एपिडेमिक डिझिज अॅक्टनुसार गुन्हा दाखल करत कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
सर्वाधिक मृत्यू अॅलोपॅथी औषधाने
रेमडेसिवीर, अॅन्टीबायोटिक, प्लाझ्मा थेरपीवर बॅन आले, फॅव्ही फ्लू ही सगळी औषधे अपयशी ठरत आहेत. तापाचे कोणतेही औषध उपयुक्त ठरत नाही. लाखो लोकांचा मृत्यू हा अॅलोपॅथीचे औषध खाल्ल्याने झाला आहे. जितके मृत्यू ऑक्सिजन आणि हॉस्पिटलमध्ये उपचार न मिळल्याने झाले नाहीत, त्यापेक्षा अधिक मृत्यू हे अॅलोपॅथीचे औषध खाऊन झाले.
-बाबा रामदेव,योग गुरू