तबलीग जमातीमुळे कोरोनाग्रस्तांची संख्या लगेच दुप्पट झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने नमूद केले. सध्या देशात ४ दिवसात रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे. जर तबलिगी जमातीचे प्रकरण घडले नसते तर ही संख्या ७ दिवसांनी दुप्पट झाली असती, असा दावा आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी केला. शनिवारपासून देशात कोरोनाचे ४७२ नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३ हजार ३७४ इतकी पोहोचली आहे. तसेच मृतांची संख्या ७९ इतकी झाली आहे, अशी माहिती अग्रवाल यांनी दिली. देशातील कोरोना विषाणूच्या स्थितीबाबत आरोग्य व कुटुंब कल्याण आणि गृहमंत्रालय यांची रविवारी संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
हेही वाचा – Coronavirus: राज्यातील ५६ कोरोना बाधित रुग्ण बरे; एकूण रुग्ण संख्या ७४८, मृत्यू ४५
शनिवारपासून आजपर्यंत कोरोनामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २६७ लोकं त्यातूम बरे झाले आहेत. त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. देशातील २७४ जिल्हे हे कोरोना विषाणूने बाधित असल्याचे अग्रवाल म्हणाले. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) चे रमन आर. गंगा खेडकर यांनी कोरोना विषाणूचा प्रसार हवेतून होण्याचा पुरावा नाही.
२७ हजार ६६१ शिबिरांमध्ये १२.५ लाख लोकांना आश्रय
गृह मंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलीला श्रीवास्तव म्हणाल्या की, लॉकडाऊनसाठी देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन राज्यांकडून केले जात आहे. अत्यावश्यक वस्तू आणि सेवांची स्थिती समाधानकारक आहे. भारतभरातील सर्व राज्यांमध्ये २७ हजार ६६१ मदत आणि निवारा शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. त्यापैकी २३ हजार ९२४ शासनाने तयार केले आहेत. तर ३ हजार ७३७ अशासकीय संस्थांनी तयार केल्या आहेत. त्यांनी सांगितले की, १२.५ लाख लोकांनी त्यांच्यामध्ये आश्रय घेतला आहे. तसेच १९ हजार ४६६० अन्नछत्र स्थापन करण्यात आली आहेत. त्यापैकी ९ हजार ९६७ सरकारने तयार केले आहेत. उर्वरित स्वयंसेवी संस्थांनी तयार केले आहेत. यातून ७५ लाखाहून अधिक लोकांना अन्न पुरवले जात आहे.