‘उत्तर प्रदेशात सपा बसपाला यश मिळणार नाही. काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांच्या प्रचारामुळे काँग्रेसचे मतदान वाढेल, त्यामुळे सपा बसपा युतीला फटका बसून भाजप चा उत्तर प्रदेशात विजय होईल. त्याचप्रमाणे देशभरात भाजप प्रणित एनडीए 370 जागांवर जिंकणार आहे. पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात केंद्रात सरकार स्थापन होईल’, असा विश्वास रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी आरपीआयच्या अधिकृत 15 उमेदवारांची यादीही त्यांनी जाहीर केली.
उत्तर प्रदेशात रिपब्लिकन पक्ष 15 जागांवर निवडणूक लढणार आहे. अन्य 65 जागांवर भाजपला आरपीआयचा पाठिंबा देणार असल्याची घोषणा रामदास आठवले यांनी यावेळी केली.
कॉँग्रेसचा प्रचार मोदींविरोधी
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मागील 5 वर्षांत चांगले काम केले आहे. महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकांचे काम केले आहे. सामान्य माणूस मोदींच्या विरुद्ध नाही केवळ काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींच्या विरुद्ध प्रचार करीत आहे. त्या प्रचाराचा उपयोग होणार नाही. आम आदमी नरेंद्र मोदिंसोबत राहणार आहे. त्यामुळे मागासवर्गीय बहुजनांचे मतदान भाजप एनडीए च्या उमेदवारांना होईल त्यामुळे देशभरात भाजप 300 आणि एनडीए एकूण 370 जागांवर विजयी होईल असा विश्वास ना रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.