पश्चिम बंगालमधील शारदा चिटफंड घोटाळ्या प्रकरणी केंद्रातील भाजप सरकार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आमनेसामने आल्या होत्या. त्यामुळे पश्चिम बंगालचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आता मेघालयची राजधानी शिलाँग येथे राजीव कुमार यांची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. दरम्यान या चौकशी बरोबरच न्यायालयाकडून त्यांना अटक करता येणार नसल्याचे आदेशही सीबीआयला देण्यात आले आहेत.
काय आहेत सीबीआयचे आरोप
शारदा चिटफंड घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एक चौकशी समिती स्थापन केली होती. या समीतीच्या अध्यक्षपदी राजीव कुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आपल्या पदाचा गैरवापर करत राजीव कुमार यांनी दोषींना वाचवण्यासाठी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका सीबीआय कडून ठेवण्यात आला आहे. गेल्या रविवारी झालेल्या वादा नंतर कोर्टाच्या आदेशानुसार आज शिलाँग येथे राजीव कुमार यांची चौकशी केली जाणार आहे.
राजीव कुमारांची चौकशीसाठी पूर्वतयारी
दरम्यान मिळालेल्या माहीतीनुसार कोलकातामधील पोलीस आधिकाऱ्यांनी सीआयडीच्या सहकार्याने राजीव कुमार यांना सीबीआयकडून कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात? याची एक यादी तयार केली आहे. त्या संदर्भात राजीव कुमार यांची पूर्व तयारी करूण घेतल्याचेही बेालले जात आहे. तत्पूर्वी गेल्या रविवारी राजीव कुमार यांची चौकशी करण्यासाठी कोलकाता येथे गेलेल्या सीबीआयला पोलीसांनी रोखून धरले होते. त्यानंतर या कारवाईच्या विरोधात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी स्वतः धरणे आंदोलनही केले. ज्याला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठींबा दिला. या सगळ्या नाट्यमय घडामोडींनंतर आता सीबीआय चौकशीतून काय निष्पन्न होणार? या कडेच सगळ्याचे लक्ष लागून राहिले आहे.